कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे अस्वच्छ पाणीपुरी कारखान्याचा पर्दाफाश
केडीएमसीच्या विशेष पथकाने छापा टाकून कारखाना सील केला
निकृष्ट तेलाचा वापर आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
तुम्हीसुद्धा स्ट्रीट म्हणजेच रस्त्यावर ठेला लावून उभ्या असणाऱ्या गाडीवरती जाऊन चवीने पाणी पुरी खाता का? असं करत असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. कारण तुमच्या आरोग्याला हानी होईल अशी डर्टी पाणीपुरी आणि शेवपुरीतुम्ही खाताय. कल्याणमध्ये या डर्टी पाणी पुरी बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरड्या वातावरणात पाणीपुरी व शेवपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या बनवल्या जात होत्या. केडीएमसीने मोठी कारवाई करत कारखाना तात्काळ सील केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस हा कारखाना सुरू होता. येथे मोठ्या प्रमाणावर पाणीपुरी आणि शेवपुरीच्या पुऱ्यांचे उत्पादन केले जात होते. स्थानिक नागरिकांकडून या कारखान्याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. तक्रारींची गंभीर दखल घेत केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान कारखान्यातील परिस्थिती पाहून अधिकारीही हादरले. पुऱ्यांसाठी वापरण्यात येणारे तेल निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. तसेच स्वच्छतेच्या मूलभूत नियमांचेही पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले. कामगारांकडून कोणतीही सुरक्षा किंवा स्वच्छतेची खबरदारी घेतली जात नसल्याने तयार होणारे खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकले असते. संजय सोकर आणि रमेश सरोज यांच्या मालकीच्या या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने तातडीने कारखाना सील करण्याची कारवाई केली.
दरम्यान, संबंधित कारखाना ज्या इमारतीत सुरू होता ती इमारत अनधिकृत असल्याचे आढळल्यास तिच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी म्हटले आहे. तसेच शहरातील अशा प्रकारच्या अस्वच्छ आणि बेकायदेशीर अन्नउत्पादन केंद्रांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.