संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज/कल्याण
कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये लहान मुलाच्या कमरेत सुई अडकली प्रकरण
अंबरनाथ मेडिकल कॉलेजच्या एका शिकाऊ डॉक्टरांनी लावले होते इंजेक्शन
इंजेक्शन लावताना केडीएमसी हॉस्पिटलच्या डॉक्टर होता गैरहजर
दोन सदस्य समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू
कल्याण डोंबिवलीमध्ये काका ढाबे परिसरात अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर पाळीव कुत्र्याने हल्ला केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाला तत्काळ महापालिकेच्या रूग्णालयात हलवण्यात आले. अँटी रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. काही दिवसानंतर मुलाला इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी त्रास होत असल्याने पालकांनी एक्स रे काढला असता. धक्कादायक कारण समोर आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कावेश नावाच्या लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी दोन सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून, प्राथमिक माहितीनुसार अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका शिकाऊ डॉक्टरने संबंधित मुलाला इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे. मात्र, इंजेक्शन देताना केडीएमसीचा वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्याचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात कुत्रा चावल्यावर उपचारासाठी दाखल असलेल्या एका लहान मुलाला इंजेक्शन देताना सुई कमरेत अडकल्याची घटना घडली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाची एकच धावपळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका शिकाऊ डॉक्टरने हे इंजेक्शन दिले होते. मात्र, अशा वेळी वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती आवश्यक असतानाही केडीएमसीचा संबंधित डॉक्टर तेथे उपस्थित नसल्याचे समोर आले आहे.
काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यकांत पांडे आणि काजल पांडे यांनी आपला अडीच वर्षाचा मुलगा कावेशला रूग्णातलयात दाखल केले होते. 2 ऑगस्ट रोजी रुक्मिणीबाई रूग्णातलयात दाखल केले होते. अँटी रेबीजची सहा इंजेक्शने देण्यात आली. एका परिचारिकेने सुरूवातीला चार इंजेक्शने दिली तर दुसऱ्या परिचारिकेने दोन इंजेक्शने दिली. शेवटचे इंजेक्शन देताना मुलाच्या कमरेत सुई अडकली. या घटनेची गंभीर दखल घेत अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा आणि केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणासाठी दोन सदस्यीय चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली असून, संपूर्ण घटनेचा अहवाल मागविण्यात आला आहे.
या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करताना आवश्यक देखरेख आणि वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती कितपत सुनिश्चित केली जाते, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. तसेच रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी किंवा अंतर्गत समन्वयाच्या अभावाचा फटका निष्पाप रुग्णांना बसत असल्याची टीकाही व्यक्त होत आहे.चौकशी अहवालानंतर या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.