संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना अद्याप मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आलेला नसल्याने त्यांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर संकट ओढवले आहे.
अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नेतीवली परिसरातील प्रबोधनकार ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार शाळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सचिन भासरे आणि सुरेश तेलावणे यांची भेट घेतली. त्यानंतर विद्यार्थी व पालकांचे शिष्टमंडळ केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात दाखल झाले. यावेळी झालेल्या बैठकीत पालकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शिक्षक आणि प्रशासनातील अंतर्गत वाद तसेच निष्काळजीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोप पालकांनी केला. मराठी शाळांमधील वर्ग बंद करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनीही उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. बैठकीदरम्यान एका महिला पालकाने व्यक्त केलेली भावना उपस्थितांच्या मनाला भिडणारी ठरली. मी मूळची उत्तर प्रदेशची आहे. माझी मुले मराठी शाळेत शिकतात. आम्ही मराठी भाषा आणि संस्कृतीचा आदर करतो. एकीकडे मराठी भाषा जपण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे मराठी शाळाच बंद केल्या जातात. कृपया शाळा बंद करू नका,अशी भावनिक विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर मराठी भाषा आणि मराठी शाळांच्या संवर्धनासाठी भूमिका घेणाऱ्या विविध राजकीय व सामाजिक संघटना या प्रश्नावर शांत का आहेत, असा सवाल पालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मराठी शाळांमधील घटती विद्यार्थीसंख्या, वर्ग बंद होणे आणि शिक्षण विभागाची भूमिका यावरून आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित हा प्रश्न प्रशासन कितपत गांभीर्याने सोडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.