माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद
पर्यायी मार्ग अरुंद असल्याने हजारो वाहनांची कोंडी
२००० प्रवासी अडकले
Kalyan Ahilyanagar Malshej Ghat Traffic Update कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी ते संथगतीने होत असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
मात्र हा पर्यायी मार्ग अरुंद, एकेरी आणि काही ठिकाणी खराब अवस्थेत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी रात्रीपासूनच या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दोन हजारांहून अधिक पर्यटक आणि प्रवासी अनेक तास रस्त्यावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
माळशेज घाट हा मुंबई, ठाणे, पुणे तसेच आहिल्यानगर परिसराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दर विकेंडला हजारो पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे शनिवार आणि रविवारी या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सध्याच्या परिस्थितीत पर्यायी मार्गाची मर्यादित क्षमता लक्षात घेता आजही मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम नसल्यास माळशेज घाट मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवास करणे आवश्यक असल्यास वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घेऊनच घराबाहेर पडावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करून नियोजनबद्ध प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.