मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी शिवसेना संपत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच सगळे पक्ष संपेल फक्त भाजप टीकेल असंही वादग्रस्त विधान नड्डा यांनी केलं होतं. या वक्तव्याचा अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला होता.
यानंतर आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी पुन्हा एकदा जे. पी. नड्डा यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला आहे. बंडानंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे प्रत्यक्ष भेटत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते, यावेळी शिवसैनिकांचे संबोधताना उद्धव ठाकरे यांनी जे. पी. नड्डांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर बोचरी टीकी केली आहे. (Uddhav Thackeray Latest Speech)
हे देखील पाहा -
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, गेले महिनाभर गर्दी आणि गर्दीच आहे. आपली लढाई दोन-तीन पातळीवर सुरू आहे. एकतर रस्त्यावरची लढाई, त्याच्यात तर आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात सुरू आहे. तिसरी लढाई तेवढीच महत्वाची आहे.
तिसरी लढाई ही शपथपत्र आणि सदस्यांची आहे. हा विषय फार गंभीर आहे. कायद्याची लढाई सुरू आहे, आपले वकिल योग्य बाजू मांडतायत, किल्ला लढवतायत. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. ही लढाई आपण जिंकणारच असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेत त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले, बंड याआधीही झाले होते, मी याआधीही अनेक बंडांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. पण आता शिवसेना संपवण्याची भाषा केली जात आहे.
राजकारणात हार-जीत होतच असते, पण आता थेट संपवण्याची भाषा केली जात आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.