Eknath Shinde announces 2900 free ST buses for Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गणेशभक्तांचा सणानिमित्त होणारा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने तब्बल २९०० एसटी बसेसची पूर्णपणे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यात पार पडलेल्या मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, समाजाला एकत्र आणणारी आणि आपली संस्कृती व परंपरा जपणारी मोठी परंपरा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. आजही त्याच परंपरेला पुढे नेत सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक प्रबोधन, विविध विषयांवरील देखावे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गणेशभक्तांनी उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करावा, अशा शुभेच्छा देत शिंदे यांनी उपक्रमासाठी आयोजकांचे आभार मानले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक राजेश मोरे, अनिल भोर, विभागप्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची मोठी इच्छा असते. मात्र, प्रत्येकाला रेल्वे किंवा अन्य वाहतुकीचे तिकीट मिळेलच असे नाही. त्यामुळे ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कोरोना काळानंतर सण-उत्सवांवरील निर्बंध हटवून नागरिकांना उत्साहाने आपले सण साजरे करता यावेत, यासाठी निर्णय घेतल्याचे सांगताना शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील विविध निर्णयांचाही आढावा घेतला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठी समाधान देणारी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांशी आपले ‘लाडका भाऊ’ म्हणून नाते निर्माण झाले, याचा आनंद आणि समाधान असल्याचे ते म्हणाले.
महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय, कौशल्य विकास, स्टार्टअप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन यांसारख्या विविध योजना राबविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.