ठाणे-बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार
दुहेरी बोगदा प्रकल्प गेमचेंजर ठरणार
ठाण्यातल्या घोडबंदरमधील वाहतूक कोंडी कमी होणार
इंधन आणि वेळेची मोठी बचत
ठाणे ते बोरीवली हा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. दीड तासांचा हा प्रवास फक्त १५ मिनिटांवर येणार आहे. यासाठी गेमचेंजर ठरणार आहे तो म्हणजे दुहेरी बोगदा. ठाणे अणि बोरिवली या दोन शहरांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या टीबीएम मशीनच्या कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी इतकी असणार आहे. तर या प्रकल्पातील गेमचेंजर ठरणाऱ्या बोगद्याची लांबी १०.२५ किमी इतकी असणार आहे. हा दुहेरी बोगदा बोरिवलीच्या बाजूने ५.७५ किमी तर ठाण्याच्या बाजूने ६.०९ किमी इतका असणार आहे. तर यातील जोड रस्त्यांची लांबी १.५९ किमी इतकी असणार आहे.
या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून दोन समांतर बोगदे बांधले जाणार आहेत. जे बोरिवलीला ठाण्यातील घोडबंदर रस्त्याशी जोडले जातील. या बोगद्याची रचना पूर्णपणे जमिनीखाली असणार आहे. हा प्रकल्प आगामी 'ठाणे कोस्टल रोड' आणि इतर प्रमुख प्रादेशिक रस्ते जाळ्यांशी एकात्मिक स्वरूपात जोडलेला आहे. नाशिक, कल्याण आणि नवी मुंबईकडून येणारी वाहने ठाणे शहराला वळसा घालून थेट या बोगद्यात प्रवेश करू शकतील. बोरिवली बाजूला, उड्डाणपुलांशी केलेल्या जोडणीमुळे दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम दिशेकडे वाहतुकीला देखील फायदा होईल.
या बोगद्याची वैशिष्ट्ये म्हणजे, हा भारतातील सर्वात खोलवर असलेला शहरी बोगदा असणार आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे. शहरी भागातील सर्वात मोठ्या व्यासाच्या बोगद्यांपैकी हा बोगदा एक असणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांखाली दुहेरी-नळीच्या भूमिगत मार्गाच्या स्वरूपात बांधले आहे. सहा-पदरी सुविधा म्हणजे ३+३ पदरी म्हणून डिझाइन केले आहे. प्रत्येक बोगदा २ वाहतुकीच्या पदरी + १ आपत्कालीन पदरी असा असणार आहे.
या दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या बोगद्यामुळे प्रवासेच अंतर २३ किमी वरून १२ किमी पर्यंत कमी होई. तसंच, प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. या बोगद्यामध्ये प्रत्येक ३०० मीटरवर क्रॉस पॅसेज असणार आहे. त्यात प्रगत व्हेंटिलेशन आणि अग्निसुरक्षा प्रणाली देण्यात येणार आहे. स्मोक डिटेक्टर, एलईडी लाइटिंग आणि रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह साइनबोर्ड असणार आहेत. ध्वनी आणि वायू प्रदूषण मर्यादित करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टची लांबी ३५० मीटरवरून १०० मीटर करण्यात आली आहे.
ठाण्यातील वाहतुकीसाठी थेट पर्यायी मार्ग उपलब्ध होईल ज्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. वेळ आणि इंधनाची बचत होईल. प्रत्येक प्रवासात ७५ मिनिटांपर्यंतची बचत होईल. तसेच इंधनाच्या वापरातही लक्षणीय घट होईल. प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी झाल्यामुळे वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनामध्ये म्हणजे प्रदूषणात घट होईल. या प्रकल्पामुळे प्रादेशिक जोडणीला चालना मिळेल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि नाशिक मार्गिका यांच्यात तसेच गुजरातशी अखंड जोडणी निर्माण होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.