संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली पश्चिम भागातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस त्रासगायक ठरू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मोठागाव रेल्वे क्रॉसिंग एलसी-१ उड्डाणपूल प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून निविदा काढण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य दिपेश म्हात्रे यांनी केली आहे. १० जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
सदर उड्डाणपूल प्रकल्पाची सर्व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली आहे. मात्र, डोंबिवलीकर नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची वाट पाहत असल्याने प्रशासनाने कोणताही विलंब न करता निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.
गेल्या पाच वर्षांपासून दिपेश म्हात्रे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सुरुवातीला प्रस्तावित असलेल्या दोन पदरी पुलाऐवजी वाढती वाहतूक लक्षात घेऊन चार पदरी उड्डाणपूल उभारण्याची मागणी त्यांनी शासन, रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागांकडे वारंवार केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प चार पदरी स्वरूपात पुढे आला असल्याचे सांगितले जात आहे.
नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान देखील म्हात्रे यांनी एलसी-१ उड्डाणपूलाचा विषय उपस्थित करत निविदा तातडीने काढण्याची मागणी केली होती. मोठागाव, मानकोली, गोपाळनगर, रेतीबंदर तसेच डोंबिवली पश्चिम परिसरातील हजारो नागरिकांना दररोज रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांचा वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणताही विलंब न करता मोठागाव एलसी-१ उड्डाणपूलाची निविदा तातडीने काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी स्थायी समिती सदस्य दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.