CM Devendra Fadnavis Mumbai master plan : भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईची तुलना जगातील अनेक मोठ्या महानगराशी केली जाते. जगभरातून अनेकजण पर्यटनासाठी आणि नोकरीसठी मायानगरीत येतात. मुंबईत मागील अनेक वर्षांमध्ये परिवर्तन झालेले आहे. पण रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील ताण यामुळे मुंबईतील प्रत्येकाचे हाल होत आहेत, कालांतराने हीच मुंबईची ओळख झाल्याचे बोलले जातेय. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महाकायापालट करण्याठी मास्टरप्लान केला अन् त्यावर अंमलबजावणी केली. फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राबवलेल्या 'मुंबई ट्रान्सफॉर्मेशन' या धोरणाने शहराला नवी कलाटणी दिली. हा बदल फक्त सिमेंट आणि काँक्रीटचा झाला नाही तर मुंबईच्या जागतिक प्रतिमेचा पुनरुद्धार करणारा ठरलाॉ.
वाहतूक व्यवस्था हा मुंबईच्या विकासाचा कणा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर 'इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम'वर भर दिला. फडणवीसांच्या काळात कागदावर असलेले प्रकल्प सत्यात उतरले अन् ते ठरलेल्या वेळेत पूर्णही झाले.
अटल सेतू (MTHL) आणि कोस्टल रोड या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी कमी झाली. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा 'अटल सेतू' फक्त एक पूल नसून तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक महामार्ग ठरला. २१.८ किलोमीटर लांबीचा हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. फक्त मुंबई आणि नवी मुंबईच नाही, तर यामुळे पुणे-गोवा महामार्ग कनेक्ट झाला. हा मार्ग सध्या मुंबईच्या विकासाचा चेहरा बनला आहे.
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नरिमन पॉइंट ते कांदिवली प्रवास वेगवान करण्यासाठी 'कोस्टल रोड' प्रकल्पाची आखणी करण्यात आली. पर्यावरणीय आव्हाने आणि तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प सुरू आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होतेय.
मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे तयार करण्याचा अनेक वर्षांपासून प्लान तयार करण्यात आला. पण ते प्रकल्प फक्त कागदावरच राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती दिली. कागदावरील प्रकल्प प्रत्यक्षात सत्यात उतरवले. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या भूमिगत मेट्रोपासून ते मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ या मार्गांपर्यंत, मुंबईच्या उपनगरांना जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे अत्यंत वेगाने विस्तारले गेले. आज लाखो मुंबईकर मेट्रो सेवेचा लाभ घेतात. त्यामुळे लोकलच्या सेवेवरील ताण कमी झालाय.
मुंबईत फक्त रस्ते अन् पूल करून चालणार नाही तर आर्थिक क्षमता आणखी वाढवणे गरजेचे होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी 'ग्लोबल फायनान्शिअल हब' बनवण्यासाठी दूरगामी पावले उचलली आहेत. भविष्यात याचे परिणाम दिसतील.
मुंबईचा विस्तीर्ण समुद्रकिनारा असूनही जलवाहतुकीचा वापर अल्प होता. फडणवीस यांनी वॉटर टॅक्सी आणि रो-रो फेरी सेवा सुरू करून मुंबई-नवी मुंबई आणि अलिबाग दरम्यानचा प्रवास सुलभ केला.
मुंबई, नवी मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळासाठी पावले उचलले. नवी मुंबईतील विमानतळ हे फडणवीसांच्या 'व्हिजन'चाच एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसराचा विकास झालाय. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
विकास हा फक्त श्रीमंतांसाठीच न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहचयला हवा, त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक धोरणांचा अवलंब केला. इतकचे नाही तर डिजिटल पायाभूत सुविधांवरही भर दिला. आजच्या युगात डेटा हेच इंधन आहे. मुंबईला आशियातील सर्वात मोठे 'डेटा सेंटर हब' बनवण्यासाठी फडणवीस सरकारने खास सवलती आणि धोरणे राबवली. यामुळे जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मुंबईत आपली कार्यालये आणि सर्व्हर्स सुरू केले आहेत. त्यामुळे मुंबईची ओळख 'फिनटेक सिटी' म्हणून होऊ लागली आहे.
जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी पावले उचलली असून त्याला कायदेशीर व आर्थिक स्वरूप दिले. या पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावीतील रहिवाशांना हक्काचे घर आणि रोजगाराची नवीन साधने मिळणार आहेत.
प्रकल्प फक्त जाहीर करणे सोपे असते, पण त्यांना प्रत्यक्षात पूर्ण करणे ही खरी कसोटी आहे. यासाठी प्रशासकीय इच्छाशक्ती, समन्वय आणि सतत पाठपुरावा आवश्यक असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी मंत्रालयात 'मुख्यमंत्री कार्यालय पायाभूत सुविधा वॉर रूम' (CMO Infrastructure War Room) स्थापन केली. या वॉर रूमच्या माध्यमातून मोठ्या-मोठ्या पायाभूत प्रकल्पांमधील अडथळे दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, कंत्राटदार आणि निर्णयकर्ते एकाच टेबलावर येतात.
मुंबईसारख्या शहरासाठी वाढती लोकसंख्या आणि मर्यादित उपलब्ध जमीन हे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'व्हर्टिकल डेव्हलपमेंट' आणि 'ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट' (TOD - रेल्वे/मेट्रो स्थानकांभोवती केंद्रित विकास) या आधुनिक शहर नियोजन संकल्पना प्रभावीपणे अमलात आणल्या आहेत.
या धोरणांमुळे मुंबईतील रेल्वे, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक केंद्रांच्या आसपास घरे, कार्यालये, दुकाने, मनोरंजन आणि इतर सोयीसुविधांचे जाळे तयार होत आहे. यामुळे जमिनीचा कार्यक्षम वापर होतो, ट्रॅफिक कमी होतो आणि शहर अधिक सुलभ व कनेक्टेड बनते. फडणवीस सरकारने मुंबईला फक्त काँक्रीटचे जंगल बनवण्यापासून दूर राहून शाश्वत (Sustainable) शहराच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत.
मुंबई हे फक्त एक शहर नाही, तर देशाच्या आर्थिक विकासाचे, ऊर्जेचे आणि गतिशीलतेचे केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने आणि निर्णायक नेतृत्वाने गेल्या काही वर्षांत मुंबईच्या विकासाला नवीन गती मिळाली आहे. अटल सेतू (Mumbai Trans Harbour Link) वरून धावणारी वाहने, मुंबई कोस्टल रोडवरील निसर्गरम्य आणि वेगवान प्रवास, तसेच मेट्रो नेटवर्कमधील सुरक्षित आणि सुलभ प्रवास—या प्रत्येक प्रकल्पात फडणवीस यांची दूरदृष्टी स्पष्ट दिसते. जे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते, ते त्यांच्या सरकारने पुनरुज्जीवित केले आणि वेगाने पूर्णत्वाकडे नेले. उदाहरणार्थ, कोस्टल रोडचा उत्तर भाग आणि अटल सेतू यांचा एकत्रित वापर मुंबईच्या दक्षिण भाग आणि उपनगरांमधील कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व गती देत आहे. येणाऱ्या काळात मुंबई जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक म्हणून उदयास येईल, यात शंका नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.