सागर आव्हाड, साम टीव्ही
राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ काही सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं बाब उघडकीस आली आहे. सरकारी नोकरीतून गलेलठ्ठ पगार घेत असतानाही लाडकीचे १५०० रुपयेही घेतल्याने सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, ' लाडकी बहिणीच्या निकषात न बसलेल्या काहींनी त्या काळात अर्ज करून लाभ घेतलाय. आता सरकारकडून चौकशी करून जे लोक अशा पद्धतीने सापडत आहे, त्यांची नावे कमी केली जात आहे. याबाबतचं काम पूर्ण झाल्यावर सविस्तर माहिती देऊ, असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावरही भाष्य केलं. 'या प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही, असे ते म्हणाले. तर निलेश चव्हाणच्या अटकेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये पळून चालला होता. त्याला योग्य प्रकारे ट्रॅप रचून पोलिसांनी अटक केली आहे'.
'मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की, या प्रकरणात जेवढे लोक आहेत, त्यातील कोणालाही सोडलं जाणार नाही. तसेच कुठल्याही प्रकारची हायघाई देखील या प्रकरणात सहन केली जाणार नाही. अतिशय कडक शिक्षा व्हावी, हा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
जालिंदर सुपेकर यांच्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याबाबतची तक्रार आली आहे. त्या तक्रारीत किती तथ्य आहे, हे मी पाहायला सांगितलं आहे. तसेच कोणीही या तपासात दबाव आणू नये, या दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतला आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.