मावळ तालुक्यातील पाटण गावावर आलेलं संकट काही संपायचं नाव घेत नाही. आधी भीषण दरड कोसळून तीन जणांचा जीव गेला आणि आता गाव रिकामं असताना चोरट्यांनी बंद घरांवर डल्ला मारत ग्रामस्थांना आणखी मोठा धक्का दिला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर आता या संकटाने पाटणकरांचं जगणं आणखी कठीण झालंय.
६ जुलै रोजी पाटण गावात भीषण दरड कोसळून एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात पुन्हा दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण गाव तातडीने रिकामं करण्याचे आदेश दिलेत. जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी घरांना कुलूप लावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. मात्र याच परिस्थितीचा फायदा चोरट्यांनी घेतला.
बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश करून तब्बल १५ ते २० बंद घरांची कुलूपं आणि कड्या फोडल्या. घरांमधील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंवर त्यांनी हात साफ केला. लाखो रुपयांचा ऐवज लंपास करून चोरटे पसार झाले. चोरीची माहिती मिळताच ग्रामस्थ गावात परतले. आपल्या घरांची झालेली तोडफोड आणि आयुष्यभराची जमवाजमव चोरीला गेल्याचं दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला. दरड दुर्घटनेच्या वेदनेतून सावरत असतानाच या चोरीमुळे गावकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही गाव सोडलं, पण आमच्या घरांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने का घेतली नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. गावात पोलीस बंदोबस्त किंवा नियमित गस्त ठेवली असती तर ही घटना टाळता आली असती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
एका बाजूला दरड दुर्घटनेत झालेली जीवितहानी आणि दुसऱ्या बाजूला घरफोड्यांमुळे झालेलं आर्थिक नुकसान अशा दुहेरी संकटाचा सामना पाटण गावाला करावा लागतोय. आता पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, तसंच गावाच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.