अभिजीत देशमुख
Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी अभय योजनेची घोषणा केली आहे. येत्या १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत या अभय योजनेचा लाभ थकबाकीदारांना घेता येणार आहे. या मुदतीत थकबाकीदार त्यांची थकबाकीची रक्कम भरु शकतात.
अभय योजना लागू झाल्यापासून दिलेल्या मुदतीत थकबाकीची रक्कम भरल्यास थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेपैकी ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. केवळ २५ टक्केच व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे.
या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.या अभय योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत जवळपास २५० कोटी रुपये जमा होईल. असा प्राथमिक अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
कल्याण डोंबिवली महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून ३५० ते ३८० कोटीचे उत्पन्न मिळते. मात्र मालमत्ताचे न्यायालयात प्रलंबित असलेले वाद, मोकळ्या भूखंडावरील कराची थकबाकी, अनधिकृत बांधकामांना आकारली जाणारी दुप्पट शास्ती यामुळे नागरिकाकडून कर भरण्यास टाळाटाळ किंवा विलंब केला जात आहे.
यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी १८०० कोटीच्या आसपास पोहोचली असून या कराच्या वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान महापालिका हद्दीत अभय योजना लागू करा हे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिल्याची माहिती युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. वाढीव मालमत्ता करापासून नागरिकांची मुक्तता व्हावी, याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली होती. (Kalyan News)
यावेळी या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे २७ गावातील पदाधिकारी यांच्यासह युवासेना सचिव म्हात्रे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत महापालिका हद्दीतील २७ गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा विषय होता. नागरिकांची वाढीव करातून मुक्तता व्हावी. त्यांना दिलासा देण्यात यावा. याकरिता अभय योजना लागू करा अशी मागणी युवा सेना सचिव म्हात्रे यांनी मागणी केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.