Mumbai Ganesh Visarjan :  
मुंबई/पुणे

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत विसर्जनाला गालबोट, विजेचा धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत गणेश विसर्जनावेळी विजेचा धक्का लागून १९ वर्षीय रोहित राठोडचा मृत्यू झाला. कृत्रिम तलावातील पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याचा प्राथमिक संशय असून मेघवाडी पोलिसांनी ADR नोंदवून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या उत्साहाला जोगेश्वरी पूर्वेत गालबोट लागले. ट्रॉमा केअर रुग्णालय परिसरातील विसर्जन व्यवस्थेदरम्यान विजेचा धक्का लागून रोहित भीमसिंग राठोड (वय १९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश विसर्जन सुरू असताना कृत्रिम तलावातील पाणी किंवा संबंधित यंत्रणेत विद्युतप्रवाह उतरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विसर्जनस्थळावरील विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी रोहित हा गौरी-गणपती विसर्जनासाठी जोगेश्वरी पूर्वेतील श्यामनगर येथील कृत्रिम तलाव परिसरात गेला होता. विसर्जन सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

रोहित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

नातेवाईकांचा प्रशासनाला सवाल

या घटनेनंतर रोहितच्या नातेवाईकांनी विसर्जनस्थळावरील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का? पाण्यात विद्युतप्रवाह उतरला असल्यास त्याची जबाबदारी कोणाची? तसेच धोकादायक परिस्थिती असताना भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश कसा देण्यात आला? असे रोखठोक सवाल नातेवाईकांनी विचारले आहेत.

पालिका प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आलेल्या यंत्रणेकडून आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी झाली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विसर्जनस्थळी विद्युत सुरक्षेबाबत महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत यापूर्वीच स्पष्ट सूचना देण्यात आल्याचा दावा गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली होती की नाही, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

रोहितच्या मृत्यूला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, विद्युतप्रवाह पाण्यात कसा उतरला आणि विसर्जन व्यवस्थेत कोणत्या स्तरावर हलगर्जीपणा झाला, याचा सखोल तपास करण्याची मागणी नातेवाईक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामध्ये संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार किंवा इतर कोणाचा निष्काळजीपणा निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) करून तपासाला सुरुवात केली आहे. विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला, यासह घटनास्थळावरील विद्युत यंत्रणा, विसर्जन व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची पोलिसांकडून सखोल पडताळणी केली जात आहे.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना थातूरमातूर मदत नको; हेक्टरी 50 हजारांची मदत द्या, रोहित पवारांचा सरकारला इशारा

Pune FDA : पुण्यात रात्रीच्या अंधारात महामार्गावर थरार! १ कोटींचा गुटख्याचा ट्रक पकडला; FDA ची सर्वात मोठी कारवाई

Eye Health : चष्मा कायमचा निघेल! रोज रात्री झोपण्यापूर्वी 'ही' एक गोष्ट खा

Foot Massage: बेडवर पडूनही रात्रभर झोप येत नाही? पायांच्या तळव्यांची 'अशी' मालिश करुन येईल गाढ झोप

Famous Actress : "पुरुषांनाही मासिक पाळी यावी..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ| VIDEO

SCROLL FOR NEXT