सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील नरवाड पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या तन्वी कमलेकर (वय 21) यांनी विजय मिळवत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. तर आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील (वय 22) हे विजयी झाले आहेत. पृथ्वीराज पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार सर्वात तरुण आणि नवखे प्रतिनिधी म्हणून विशेष चर्चेत आले आहेत. अल्पवयातच जनतेचा विश्वास संपादन करत त्यांनी अनुभवापेक्षा कामाची तयारी आणि दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना दोन्ही विजयी उमेदवारांनी सांगितले की विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्न हेच त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे होते. जनतेने विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत आपल्याला संधी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या 6 जागा निवडून आल्या आहेत. तर धनशक्तीपेक्षा कामाच्या जोरावर जनतेने निवडून दिले आहे. पैशाचा अतिवापर या ठिकाणी झाला. मात्र जनता ही कामाच्या बरोबर राहिली. मी आमदार म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून वावरत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी दिली. शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर आमदार सुहास बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती.
जत तालुक्यातील 9 पैकी 8 जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला जनतेने विजय मिळवून दिलाय. मुख्यमंत्री देवाभाऊंनी जत तालुक्यात विकासाचा जो धडाका लावला आहे. त्यामुळे जनतेने भाजपला यश दिलेले आहे. आटपाडी तालुक्यात मात्र अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये तीन जागांवर भाजपचा पराभव झालाय. केवळ निंबवडे या गटामध्ये भाजपचा विजय झालाय. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झालाय त्या ठिकाणची मी जबाबदारी स्वतः घेतो. यापुढे चुका दुरुस्त करून आम्ही लोकांपुढे जाऊ. केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि रवींद्र हे गणित आता पक्के झालेय. अजितदादांचा दुर्दैवी निधन झाल्यानंतर कोणतीही सभा घ्यायची नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं होतं. परंतु भाजपवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सिद्ध झालाय. अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.