संजय राठोड | साम टीव्ही | यवतमाळ प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीचा धुरळा महाराष्ट्रात उडालाय. १७ जागांवर महायुतीचा मविआसोबत थेट सामना होणार आहे. पण या निवडणुकीच्या सुरूवातीलाच मविआला जोरदार धक्का बसलाय. यवतमाळमधील अधिकृत उमेदवाराने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे नाट्य पाहायला मिळाले. त्याशिवाय सोलापूरमधील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचेही समोर आलेय.
यवतमाळमध्ये मविआने साहेबराव कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यांचा सामना दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांच्यासोबत होणार होता. पण त्याआधीच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी यवतमाळ विधान परिषद निवडणूकीतून माघार घेतली. हा मविआसाठी मोठा झटका मानला जातोय. कांबळेंच्या माघारीनंतर मविआ आता काय निर्णय घेणार? याकडे यवतमाळमधील कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेय.
साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली, हा मविआसाठी मोठा धक्का मानला जातोय. साहेबराव कांबळे यांनी संख्याबळ जुळत नसल्याने मी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे कारण सांगितलेय. यावेळी त्यांनी कॉग्रेसकडून तिकीट दिलं त्याबाबद्दल आभारही मानले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी माघारी घेतली. साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्यानंतर मविआ यवतमाळमध्ये कुणाला पाठिंबा देणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांचा विजय सूकर झालाय.
विधान परिषदेसाठी नामांकन मागे घेण्याची मुदत उद्या, ४ जून रोजी असताना, त्यापूर्वीच एक दिवस आधी काँग्रेसचे कांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामुळे कांबळे यांनी नेमक्या कोणाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत शिंदेसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत, तर भाजपमधून बंडखोरी करत भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नितीन भुतडा सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यातच काल भुतडा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले; ज्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच पेव फुटले आहे.जर भाजप बंडखोर नितीन भुतडा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पडद्यामागून साथ दिली, तर मात्र शिंदेसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदींचे समीकरण पूर्णपणे बिघडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत फक्त नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती नसल्याने एकूण 446 मतदार नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
भाजप (125)
शिंदेसेन (107)
राष्ट्रवादी अजित पवार गट (29)
महायुतीकडे 261 मतदान आहे.
काॅग्रेस (99)
शिवसेना ठाकारे गट (23)
राष्ट्रवादी शरद पवार गट (3)
महाविकास आघाडीकडे 125 मते आहेत.
याशिवाय एम आय एम सात वंचित पाच जनशक्ती (20) आणि तब्बल अपक्ष (20) नगरसेवकांची मते निर्णायक ठरणार आहेत.
महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप बंडखोर नितीन भुतडा यांनी जर का उमेदवारी कायम ठेवली तर मात्र शिंदेसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. काॅग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काॅग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरलाय. काँग्रेसचे एकंदरीतच महाविकास आघाडीचे नगरसेवक नेमके आता कुणाच्या बाजूने जाणार, हे येणारी वेळ सांगणार आहे. मविआ नितीन भुतडा यांच्या मागे उभे राहणार का? असाही सवाल यवतमाळमध्ये उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.