राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली
सात जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे मोठे नुकसान
शेतकऱ्यांकडून तातडीच्या पंचनामे व भरपाईची मागणी
राज्यात पावसाला पोषक वातावरण झाल्याने किमान आणि कमाल तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. काल अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.तसेच अनेक ठिकाणी पावसासोबतच गारपीटांचा वर्षाव झाला. आज राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय किनारी भागासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगढ आणि उत्तराखंड या ८ राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना म्हणजेच नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, परभणी, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे.
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी, पपई, टरबूज, गहू, हरभरा त्याचबरोबर कांदा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काल दुपारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. शिरपूर तालुक्यातील भाटपुरा परिसरात झालेल्या या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. आता या नुकसानीतून सावरण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात आज नांदगाव,येवला तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बदापुर येथील शेतकरी अशोक पवार यांच्या २ एकरात लावलेल्या उभ्या गहू पीक आडवे झाले आहे. याच बरोबर काढणीला आलेल्या कांदा पिकाला फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात काल सायंकाळच्या वेळेस अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने ,रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेले गहू, हरबरा, मकासह केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जळगाव,रावेर,भुसावळ धरणगाव,चाळीसगाव या तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.