सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्येपूर्वी दोन्ही शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या लिहिल्या असून चिठ्ठीत पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्या केल्याचं नमुद केलं आहे.
शेतकरी शरद गंभीर व लक्ष्मण गावसाने हे कर्ज आणि पिकांच्या नुकसानीमुळे नैराश्यात होते.
पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोक्यावरील बॅंकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, घरखर्च या विचारांनी त्रासलेल्या बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावातील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद भागवत गंभीर (वर्षे ३९) व लक्ष्मण काशीनाथ गावसाने (वर्षे ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, शरद गंभीर हे दोन-तीन दिवसापासून नैराश्येत होते. त्यामुळेच शरद यांनी बुधवारी शेतातील घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पांगरी पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. दुसरीकडे दहिटणे येथील लक्ष्मण गावसाने हे वैरागला बाजारला जातो, असे सांगून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. मात्र दुपारनंतरही ते घरी न आल्याने त्यांच्या बायकोने दिर सागर गावसाने यांना नवऱ्याचा फोन लागत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सागर यांनी भावाचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. भावाचा शोध घेण्यासाठी मोबाईलवर स्टेटस ठेवले होते.
दरम्यान, सासुरे येथील सज्जन करंडे यांनी सागर गावसाने यांना बुधवारी सकाळच्या सुमारास फोन केला. यादव यांच्या शेतातील झाडाला एकाने गळफास घेतला आहे, तो तुमचाच भाऊ आहे का? याची खात्री करा, असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात खात्री केली असता सागर यांचा भाऊ लक्ष्मण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी वैराग पोलिसांत धाव घेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिस या घटनेचा खोल तपास करत आहेत.
आत्महत्या केलेल्या दोन्ही शेतकऱ्यांचं ओल्या दुष्काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या दोघांच्याही मागे त्यांचं कुटुंब आहे. शरद गंभीर या शेतकऱ्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुटुंबासाठी तो आधार होता. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहली होती. त्यात ‘पाऊस सारखा पडत आहे, पावसामुळे माझ्या शेतात पाणी साचले, पिकांचे मोठे नुकसान झाले, आता माझ्यावर असलेले कर्ज कसे फेडू, मुलांच्या शिक्षणाचे कसे होईल, मला माफ करा, माझ्या मुलांची काळजी घ्या’, असे भावनिक मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे.
मृत शेतकरी लक्ष्मण गावसाने यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी ‘बी फार्मसी’चे शिक्षण घेत आहे. तर मुलगा धाराशिव येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, मृत लक्ष्मण यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी ‘अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने आत्महत्या करीत आहे, माझ्या मुलांकडे लक्ष द्या, मला मदत करा’ असे चिठ्ठीत नमूद असल्याचे वैराग पोलिसांनी सांगितले. दरम्यान पोलीस या दोन्ही घटनेचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.