सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतात लागवड केलेल्या पिकांमधुन हाती काहीच लागणार नाही; या विवंचनेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतांमध्ये देखील तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती, तांदूळवाडी, पिंजरवाडी, संगदरी या परिसरात यंदा अतिवृष्टी झाली. सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. अर्थात आतापर्यंत केलेला खर्च निघणे देखील कठीण झाले असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतात जाऊन घेतला गळफास
दरम्यान पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान पाहून मुस्ती येथील चंद्रकांत गुरुपादप्पा माळगे (वय ७५) या वृद्ध शेतकऱ्याने शेतातील वस्तीवर गळफास लावून आत्महत्या केली. मृत चंद्रकांत माळगे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांची तीन एकर जिराईत जमीन होती. या जमिनीत त्यांनी उडीद, मूग आणि कांदा ही पिके घेतली होती. अतिवृष्टीमुळे सर्वच खरीप पिकांची नासाडी झाल्याने काहीच उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेत ते होते.
शेतीवरच होता उदरनिर्वाह
गेले काही दिवस याच विचाराने त्यांना ग्रासले होते. शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. एकुलता एक मुलगा असून तो देखील शेतीवर अवलंबून आहे. पावसामुळे नुकसान झाल्याने पुढे करायचे काय? असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मत नातेवाईकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करावी अशी मागणी मृत शेतकऱ्याचे नातेवाईक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.