मुंबई : एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहे. गुरुवारी त्यांनी औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीलाही त्यांनी भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादरही चढवली. यावेळी त्यांच्यासोबत इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), वारीस पठाण यांची उपस्थिती होती. ओवेसींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचं (Aurangzebs Tomb) दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेलं आव्हान असून आपण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका असा इशारा दिला आहे. (Sanjay Raus vs Akbaruddin Owaisi)
काय म्हणाले संजय राऊत?
"एमआयएम नेत्यांनी संभाजीनगर वारंवार यायचं आणि खुलताबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. हे कृत्य करून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम ओवैसी बंधू करत आहेत. पण मी त्यांना इतकंच सांगेल की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत मराठ्यांनीच टाकलं आहे. आता तुम्ही या कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीत जावं लागेल".
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “औरंगजेब हा काही महान संत नव्हता. महाराष्ट्रावर आक्रमण करत त्याने मंदिरे उद्ध्वस्त केली. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योध्द्यांनी त्याच्यासोबत लढाई लढली आहे. पण आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
'ओवेसींवर कारवाई करा, अन्यथा...'
दरम्यान गुरुवारी ओवैसी बंधूंनी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. त्यांच्या या भेटीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. मनसेकडून सुद्धा या गोष्टीचा निषेध करण्यात आला असून राज्य सरकारने अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते गजानन काळे यांनी दिला.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.