बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. वाल्मिक कराडचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे तिघे एकत्रित जात असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या २९ नोव्हेंबरचे हे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'ही खंडणी नव्हती तर इलेक्शन फंड होता.', असं मोठं विधान केले आहे. त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'हा 24/09/2024 चा व्हिडीओ आहे. हे खंडणीच प्रकरण, ही खंडणी नव्हतीस तर हा इलेक्शन फंड होता. त्या काळातला इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा खंडणी आणि दादागिरीतून वसूल केला जात होता. सर्वात धक्कादायक म्हणजे यात एक पोलिस दिसत आहे. मी वारंवार आरोप करतोय की पोलिस यंत्रणा आणि कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हात मिळवणी आणि वाढलेली गुन्हेगारी हे सूत्र आहे.
तसंच, 'या सूत्राकडे सरकार लक्ष्यच द्यायला तयार नाही. आता यापेक्षा मोठा काय पुरावा हवाय तुम्हाला, पोलिस, वाल्मिक कराड आणि खून प्रकरणातील सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत. तरी देखील सरकार म्हणत असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाहीत तर काय करायचं?', असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर देखील आव्हाडांनी मोठं विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, 'या सर्व गुन्ह्यांमध्ये राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलिस अधिकारी आहे त्याला आरोपी करा, मास्टर माईंड आणि मास्टर माईंडचा गेम सेट करणारा हा राजेश पाटीलच आहे. सरकारने आता योग्य तो निर्णय घ्यावा. आता सरकारने कशाची वाट बघायची. काल अक्षय शिंदे उघडा पडला, सरकारला जो काय रॉबिन वूड व्हायचं होत ते रॉबिन वूड उघड पडलं. अक्षय शिंदेच्या प्रकरणात संजय शिंदे नावाचा पोलिस आहे. त्याला गाडीत बसवला कोणी? संजय शिंदे बरोबर चर्चा कोणी केली? तो अधिकारी होता? तुम्हाला माहित नसेल तर पुढच्या आठ दिवसांत मी नाव सांगतो. या असल्या गोष्टींमुळे महाराष्ट्र पोलिसांची खाकीतली दादागिरी खतम होत चालली आहे.
'मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात भाई, डॉन, दादागिरी एकाचीच चालणार ती म्हणजे पोलिसांची. जे नवीन जन्माला येत आहेत ते राजकीय हस्तक आहेत आणि या राजकीय हस्तकांसोबत आपली गणित सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. अक्षय शिंदे, संतोष देशमुख प्रकरण हा हप्त्याचा व्हिडीओ यातून पोलिस कुठपर्यंत गुन्हेगारी करण्यापर्यंत गेलेत याचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र पोलिसांना वाचविण्याची वेळ आली आहे. तुमच्या राज्यात पोलिस हस्तक येणार नाही याची खबरदारी घेतली नाही तर विरोधी पक्षाला हे मान्य नाही.' , असे आव्हाडांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.