Sanjay Raut claim on Devendra Fadnavis becoming Deputy Prime Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यांवरून आणि केंद्रातील संभाव्य फेरबदलांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचा एक मराठी माणूस देशाचा उपपंतप्रधान होणार असेल, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असे विधान संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने केंद्रात आणि RSS मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचा दावा केला आहे.
दिल्लीत मोठ्या उलथापालथीची शक्यता
संजय राऊत यांनी कोल्हापूरमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राजकारणात एन्ट्री आणि दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा केला. संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणात लवकरच खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करायचा आहे. मात्र पक्ष आणि सरकारमधील अंतर्गत मतभेदांमुळे हा निर्णय अद्याप रखडला आहे.
भाजपच्या चार वरिष्ठ मंत्र्यांचे बंड?
केंद्रातील परिस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी दावा केला की, "मूळ भाजपचे चार महत्त्वाचे आणि वरिष्ठ मंत्री राजीनामा देण्यास तयार नाहीत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला या मंत्र्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. 'आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या, मगच आम्ही राजीनामा देऊ' अशी भूमिका या मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा फेरबदल रेंगाळला आहे."
आरएसएसची नवी रणनीती आणि उपपंतप्रधानपद
राऊत यांच्या मते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) या फेरबदलात एक विशेष भूमिका आहे. संघाने केंद्रीय मंत्रिमंडळात 'उपपंतप्रधान' हे पद निर्माण करण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधान मोदींनंतरचा पुढील वारसदार म्हणून अमित शाह यांच्याऐवजी संघाची निष्ठा असलेल्या एका नेत्याला या पदावर बसवण्याची योजना आहे, असा दावा त्यांनी केला. "अमित शाह यांचा राजकीय खेळ आता संपलेला आहे," अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
'दर ७२ तासांनी दिल्लीत कशासाठी जातात?'
देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांवर राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. "एका राज्याचा मुख्यमंत्री किंवा नेता दर ७२ तासांनी दिल्लीला का जातो? ते तिथे जाऊन नेमकी काय चर्चा करतात, याची खडान् खडा माहिती माझ्याकडे आहे," असा दावा राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "फडणवीस दिल्लीत जावेत आणि त्यांनी देश पातळीवर सर्वोच्च पद मिळवावे, अशी इच्छा केवळ एकनाथ शिंदे यांचीच नाही, तर इतर अनेक नेत्यांचीही आहे."
आपल्याकडे इंटेलिजन्सची चोख माहिती असून, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हेसुद्धा मी सांगू शकतो, असा दावाही राऊत यांनी शेवटी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.