सांगली : विवाह झाल्यानंतर काही महिन्यात नवविवाहितेचा छळ सुरु केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातून नवविवाहिता टोकाचा निर्णय घेत आत्महत्येसारखे पाऊल उचलत असते. अशीच घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत छळ केला जात असल्याने कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथे सदरची धक्कादायक घटना घडली असून अमृता ऋषिकेश गुरव असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. साधारण एक वर्षापूर्वी घरच्यांचा विरोध डावलून अमृताने ऋषिकेश सोबत प्रेमविवाह केला होता. २६ डिसेंबर २०२४ रोजी ऋषिकेश व अमृताचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर अमृता हि इश्वरपूर येथे पती ऋषिकेश, सासू- सासरे व ननंद यांच्यासोबत वास्तव्यास होती.
दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा
दरम्यान विवाहाला काही महिने उलटल्यानंतर सासरच्या मंडळींकडून अमृता हिचा छळ सुरु झाला होता. काही महिन्यात पती ऋषिकेश आणि सासर्यांचे लोक हे सासू अनुपमा यांच्या आजारपणासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत; यासाठी अमृता हिच्याकडे तगादा लावला होता. तिला मारहाण करून मानसिक छळ करीत होते. पती ऋषिकेश हा मारहाण करत होता. तर सासू आणि नणंद वारंवार अपमान करत होते. तर मामा नंदकिशोर हा ऋषिकेश याला तू अमृताला सोडून दे तुझं आपल्या जातीतील मुलीशी लग्न लावून देतो म्हणून अमृताला मानसिक त्रास देत होता.
पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल
सततच्या त्रासाला कंटाळून अमृता हिने शुक्रवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिला इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार समजतात, अमृताच्या आई- वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे अमृताने घडलेला सर्व प्रकार आई- वडिलांना सांगितला. तिची प्रकृती बिघडल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पती ऋषिकेश, सासू सासरे व ननंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.