मालेगाव स्फोट प्रकरणात सर्व ७ आरोपी निर्दोष मुक्त
१७ वर्षांनंतर साध्वी प्रज्ञा यांना दिलासा
१३ दिवस टॉर्चर केलं, हा भगव्याचा विजय; प्रज्ञा यांची कोर्टात प्रतिक्रिया
मालेगावमध्ये १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दाखल खटल्याचा गुरुवारी (३१ जुलै) निकाल लागला. एनआयएच्या विशेष न्यायालयानं सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात भोपाळमधील भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर प्रज्ञासिंह यांना रडू कोसळलं. हा भगव्याचा विजय आहे. मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आलं होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील मालेगाव २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोटानं हादरलं होतं. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. एनआयएच्या विशेष न्यायालयानं या प्रकरणी आज निकाल सुनावला. अनेक आरोप सिद्ध करण्यात एनआयए अपयशी ठरली. दहशतवादाचा कोणताही रंग किंवा धर्म नसतो, असं न्यायालयानं निकाल देताना नमूद केलं.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा या कोर्टातच रडल्या. मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आलं होतं. मी खूप अपमान सहन केला. संन्याशाचं आयुष्य जगत होते. आम्हाला दहशतवादी ठरवण्यात आलं. ज्या लोकांनी आमच्यासोबत चुकीचं केलं, त्यांच्याबद्दलही बोलू शकत नाही. १७ वर्षांपासून लढा देत आहे. भगव्याला कलंकित करण्यात आलं, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा यांनी दिली.
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, या निकालानं मला आनंद झालाय. आमचं दुःख, वेदना समजून घेतल्या. हा खटला आम्ही नाही तर भगव्यानं जिंकला आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आहे. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. ज्या लोकांनी हिंदू दहशतवाद म्हटलं, भगवा दहशतवाद म्हटलं त्यांना शिक्षा होईल.'
न्यायालयानं या खटल्यात सात जणांना आरोपी केलं होतं. साध्वी प्रज्ञा यांच्या व्यतिरिक्त कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिलकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर द्विवेदी यांना आरोपी करण्यात आलं होतं. पुरोहित यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. गाडी कुणी पार्क केली, कुणी बॉम्ब ठेवला, कुणी रेकी केली याबाबतचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असं न्यायालयानं नमूद केलं.
निर्दोष मुक्त झाल्यानंतर कर्नल पुरोहित काय म्हणाले?
या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांनीही प्रतिक्रिया दिली. तुम्ही हा निकाल दिला त्याबद्दल धन्यवाद. मी आर्मीसाठी काम केलं आहे. पुढेही करत राहणार आहे. जे आमच्यासोबत झालं, त्याबद्दल कुणालाही दोष देत नाही. अनेकदा अशा संस्था किंवा तपास यंत्रणा या आजारी होतात, त्यांच्यात भेसळ होते, या संस्था वाईट नाहीत. त्यात काही लोक वाईट असतात. ते कायद्याचा गैरवापर करतात, असं पुरोहित म्हणाले.
या प्रकरणात साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. मालेगाव बॉम्बस्फोटाचा संपूर्ण कट त्यांनी रचला होता असा आरोप त्यांच्यावर होता. एप्रिल २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सातही आरोपींना जामीन दिला होता. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा यांना जवळपास आठ वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. आता त्यांची या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे.
मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला. एका दुचाकीत बॉम्ब ठेवून स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर ९५ हून अधिक जण जखमी झाले होते. बॉम्ब एका दुचाकीला बांधण्यात आला होता. ती दुचाकी प्रज्ञा सिंह यांची होती, असं तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं होतं. साध्वी प्रज्ञा यांना २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करण्यात आली होती. चौकशीनंतर एटीएस पथकाने अन्य आरोपींनाही अटक केली होती. आता १७ वर्षांनी आरोप सिद्ध न झाल्याने या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.