Raj Thackeray, Mumbai-Goa Highway, Third Mumbai Project : काय चाटायची आहे ती प्रगती? असा संतप्त सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा आणि 'तिसऱ्या मुंबई'च्या नियोजित प्रकल्पावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी सरकारच्या विकास धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील जमीन, पाणी आणि वीज वापरून होणाऱ्या विकासाचा फायदा जर राज्यातील स्थानिक तरुण-तरुणींना आणि शेतकऱ्यांना होणार नसेल, तर अशा प्रगतीचा काहीही उपयोग नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
सिंगापूर कंपनीचा आराखडा आणि पारदर्शकतेचा अभाव
रायगडच्या विकासाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सिंगापूरच्या एका कंपनीला रायगडच्या विकासाचा प्लॅन आखायला दिला गेला आहे. पण याची कोणतीही माहिती रायगडमधील जनतेला किंवा स्थानिक तरुण-तरुणींना दिलेली नाही. रस्ते नीट बनवले जात नाहीत आणि कोणते उद्योग येत आहेत याबद्दल गुप्तता पाळली जाते. सर्वसामान्य जनतेला सोयीस्करपणे अंधारात ठेवून कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
'तिसरी मुंबई' आणि स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न
शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या 'तिसऱ्या मुंबई' प्रकल्पाचा संदर्भ देत त्यांनी स्थानिकांच्या भवितव्याबाबत भीती व्यक्त केली. "तिथे बीकेसीपेक्षा मोठे व्यावसायिक केंद्र, ग्लोबल डेटा सेंटर आणि आयटी कंपन्या उभारल्या जातील. परंतु, या प्रकल्पांची माहिती राज्यातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्थानिक तरुणांना या उद्योगांसाठी आणि नोकऱ्यांसाठी तयार केले जात नसून, बाहेरच्या राज्यातील लोक येऊन या नोकऱ्या लाटतील आणि आपले स्थानिक तरुण फक्त बघत राहतील, असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिकांना फायदा नसेल, तर चाटायची आहे प्रगती?
महाराष्ट्रातील जमीन, पाणी आणि वीज वापरून जर विकास केला जात असेल आणि त्याचा फायदा राज्यातील तरुण-तरुणींना होणार नसेल, तर अशा 'प्रगती'चा काय उपयोग? असा संतप्त सवाल त्यांनी केला. विकासाच्या नावाखाली जमिनीचे मोठे तुकडे ताब्यात घेऊन बड्या उद्योजकांच्या घशात घातले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच राजकारणातील घराणेशाहीवर थेट नावे घेऊन टीका करताना, निवडणुकीच्या काळात तात्पुरत्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. "पैसे घेऊन मतदान केल्यामुळे आपल्या पायाखालच्या जमिनी आणि मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे," असा सूचक इशारा देत स्थानिकांनी या प्रकारांना ठामपणे विरोध करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था अन् 'टक्केवारी'चा कारभार
मुंबई-गोवा महामार्गासह नवीन बनवलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी प्रशासनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्ता टिकाऊ आणि चांगला व्हावा यापेक्षा 'याच्यातून टक्का कसा मिळेल' यावरच प्रशासनाचा आणि नेत्यांचा जास्त भर असतो, अशी सडकून टीका त्यांनी केली.
पालकमंत्री ही फालतू गोष्ट, मग यांना आई-बाप मानायचं का?
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "पालकमंत्री ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. पालक म्हणजे आई-बाप; मग यांना आपण आपले आई-बाप मानायचे का?" असा थेट आणि तिखट सवाल विचारत त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. सर्व निर्णय सरकारने घ्यायचे असतात आणि जनतेचे हित सांभाळायचे असते, हे काम पालकमंत्र्यांचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.