Raj Thackeray on NEET paper leak controversy : देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटीच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारसह कोचिंग क्लासेसच्या मनमानीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आतापर्यंतचे सर्व पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले असून हा शिक्षणाचा मोठा धंदा बनल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला आहे. कॉलेजची फी अवघी २० हजार रुपये आणि कोचिंग क्लासची फी १ लाख रुपये, एवढी मोठी तफावत असताना विद्यार्थ्यांनी चिडायचे नाही तर काय करायचे? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटलांनी दगड-मातीवरील ठसे आणि आधार चेक करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे आधी लक्ष द्यावे, असा थेट इशारा देत राज ठाकरेंनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे, शहरातील खड्डे, गुजरातच्या कंत्राटदारांची मक्तेदारी आणि NEET परीक्षा घोटाळा यावरून राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले.
NEET परीक्षा घोटाळा अन् कोचिंग क्लासेसवर हल्लाबोल:
NEET परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिक्षणातील या अनागोंदीविरोधात अनेक वर्षांनी असा संताप बाहेर आला आहे. तरुणांना आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने मारण्यात आले, ते पाहून प्रत्येक आई-वडिलांना आपल्याच मुलाला मारल्यासारखे वाटले. जंतर-मंतरवरील आंदोलन ही तर फक्त सुरुवात आहे, भविष्यात हा राग आणखी मोठ्या प्रमाणावर बाहेर येईल.
तसेच कोचिंग क्लासेसवर ताशेरे ओढताना ते म्हणाले, दहावी पास झाल्यावर विद्यार्थी कोणत्या कॉलेजला जाणार, हे आता कोचिंग क्लासेस ठरवणार का? हा आता मोठा धंदा झाला आहे. आजवरचे NEET चे सर्व पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले आहेत. त्यामुळे सरकारने आधी या क्लासेसवर लक्ष दिले पाहिजे. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासची फी १ लाख रुपये, एवढी मोठी तफावत असताना विद्यार्थ्यांनी चिडायचे नाही तर काय करायचे? चंद्रकांत पाटील यांनी दगड-मातीवरील ठसे घेऊन 'आधार' चेक करण्यापेक्षा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिकच्या दुरवस्थेवर संताप:
कुंभमेळ्याच्या कामांवरून बोलताना राज ठाकरे म्हणाले, माझ्या काळात २०१५ चा कुंभमेळा झाला, तो अतिशय सोप्या अन् चांगल्या पद्धतीने झाला; कारण त्यामागे पैसे काढणे हा आमचा उद्देश नव्हता. कामे पूर्ण झाल्यावर लोकांना कळले होते की नाशिक किती सुंदर झाले आहे. मात्र, सध्याचे प्रशासन पूर्णपणे ढिम्म आहे. संपूर्ण नाशिकमध्ये खड्डे पडले आहेत. प्रशासनाला फक्त कामांतून कमिशन कसे मिळेल यातच रस आहे. महाराष्ट्रात कुणी नाही का, जे गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टर्सना कामे दिली जात आहेत? वरून आदेश येतात आणि तसेच हाताळले जाते.
आम्ही २०१३ मध्ये सुंदर नाशिक बनवले होते, पण आता त्याची वाट लावली जात आहे. झाडे तोडली जात आहेत, शहरांचे वाटोळे होत आहे. निवडणुकाही फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहेत. एवढे होऊनही लोक भाजपलाच निवडून देत असतील, तर मग आता भोगा, असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.