अमित गवळे, प्रतिनिधी
रायगड: राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच रायगड जिल्ह्यात एका घटनेने प्रशासनाची चांगलीच धाकधूक वाढवलीय. खालापूर तालुक्यातील चावणे-जांभिवलीमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीची संरक्षण भिंत पुराच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. हे सिलेंडर नाल्याच्या मार्गाने थेट पाताळगंगा नदीत गेल्याचा आता व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बुधवारी झालेल्या दाणादाण पावसामुळे चावणे-जांभिवली परिसरात पुसदृश परिस्थिती निर्माण झाली. पुराच्या वेगवान पाण्याने HPCL कंपनीच्या परिसरालगत उभारलेली संरक्षण भिंत काही वेळत कोसळली. भिंत कोसळताच परिसरात साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. हे सिलेंडर पाताळगंगा नदीत वाहून गेल्याची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पातळगंगा नदी आणि परिसरातील नाल्यामध्ये गॅस सिलेंडर वाहत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. तर काही ग्रामस्थ सिलेंडर घेण्यासाठी थेट पाण्यात उतरले.
पाताळगंगा नदीत वाहून गेलेल्या एचपीसीएलच्या गॅस सिलेंडरबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. नदीतून किंवा परिसरात वाहून आलेले सिलेंडर कोणालाही आढळल्यास ते स्वतःकडे ठेवू नयेत किंवा त्यांची हाताळणी करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी असे सिलेंडर तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळच्या वितरक, तहसीलदार कार्यालय खालापूर, तहसीलदार कार्यालय पेण किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आवाहन केले आहे. बुधवारी चावणे येथील एचपीसीएलच्या रिफिलिंग प्लांटच्या गोदामाची भिंत कोसळल्याने सुमारे तीन हजार गॅस सिलेंडर पाताळगंगा नदीत वाहून गेले होते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये आणि प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे पातळगंगा नदीत बुधवारी हजारो गॅस सिलिंडर वाहून गेल्याच्या घटनेनंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिलेंडर तात्काळ जमा न केल्यास कारवाई होणार असून सुरक्षिततेचे आवाहन देखील केले आहे.
अतिवृष्टीमुळे पनवेलमधील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून अंदाजे ३,००० भरलेले आणि रिकामे सिलेंडर नदीपात्रात वाहून गेल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. हे सिलेंडर गोळा करण्यासाठी पेण तालुक्यातील खारपाड्यापासून दादर गावापर्यंतच्या नागरिकांनी खाडीत चढाओढ केली होती. अनेक जण छोट्या बोटी घेऊन पाण्यात उतरले होते, तर पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, हे सिलिंडर स्वतःजवळ ठेवणे किंवा वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी हे सिलिंडर घरी न ठेवता तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळचे गॅस डीलर, खालापूर व पेणचे तहसीलदार कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करावेत. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.