केंद्रीय मंत्री नारायण राणे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांवरुन चर्चेत असतात. कोकणातील भाजपचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सुरुवातीला शिवसेना, नंतर काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठमोठी पदे भूषवणारे राणे अचानक भाजपमध्ये का गेले? असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहेत. याबाबत स्वत: नारायण राणे यांनी खुलासा केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाचा किस्सा सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझ्या मागे लागले होते, त्यामुळे मी भाजपमध्ये गेलो, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे."देवेंद्र फडणवीस आणि मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या लग्नावरून विमानाने येत होतो. त्यावेळी विमानातून उतरल्यावर देवेंद्र फडणवीस चालत चालत माझ्याकडे आले", असं नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटलं.
"दादा जरा बाजूला या म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मला बाजूला बोलावून घेतलं. तेव्हा मला त्यांनी रस्त्यातच सांगितलं, दादा पक्षात या. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, अरे मी एका पक्षाचा नेता आहे आणि तु आम्हाला रस्त्यात अशा पद्धतीने विचारतोस"?
तु मला भेट आणि त्यानंतर आपण याविषयी चर्चा करू आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ. त्यानंतर आम्ही पुन्हा भेटलो आणि आमची सविस्तर चर्चा झाली. मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत असतो. त्यानुसार मी विचार केला आणि त्यानंतर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, नारायण राणे भाजपात आल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा केंद्रात विस्तार झाला, तेव्हा त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना नारायण राणे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राणे यांना अटकही झाली होती. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.