सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा उघडपणे सुरू असलेला कामचुकारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. धडगाव तालुक्यातील नर्मदा काठाजवळ असलेल्या माळ गावातील कारभारी पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत दुपारी तीन वाजताच शाळा बंद करून शिक्षक निघून जात असल्याचा संतापजनक प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. त्यामुळे, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील माळ गावातील कारभारी पाडा येथील जिल्हा परिषद शाळा आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरणाऱ्या या शाळेची वेळ पूर्ण होण्याआधीच शाळा बंद करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज दुपारी तीन वाजताच शिक्षक शाळेला कुलूप लावून निघून जातात. वास्तविक, शाळा पूर्ण ५ वाजेपर्यंत सुरु राहणे अपेक्षित असताना शिक्षकांच्या या तीन वाजताच्या सुट्टीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
रोज दोनच शिक्षक राहतात हजर
शाळेत एकूण तीन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, या तीन शिक्षकांपैकी फक्त एक किंवा दोनच शिक्षक आडीपाडीने शाळेत उपस्थित राहत असल्याचा प्रकारही ग्रामस्थांनी सांगितला. दुर्गम भागात शिक्षणासाठी धडपडणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षकांनी केलेली ही गैरहजेरी आणि कामचुकारपणा अत्यंत निंदनीय असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शिक्षकांवर कारवाईची मागणी
शिक्षकांच्या या गैरवर्तनामुळे पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या शिक्षकांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कठोर कारवाई करावी; अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.