सागर निकवाडे
नंदुरबार : अक्कलकुवा दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगी, बारीपाडा गावातील एका गर्भवती महिलेला रस्ता नसल्याने तब्बल सात किलोमीटर बांबूच्या झोळीतून रुग्णालयात पोहोचवावे लागले. अर्थात सातपुड्यातील हा जीवघेणा प्रवास थांबता थांबत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
आदिवासी पाड्यांतील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा गावातील येथील अनिता वसावे (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आल्याने अनिता वसावे यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. परंतु, गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. शिवाय, त्या भागात मोबाईल रेंज नसल्याने रुग्णवाहिकेला फोनही लागला नाही.
७ किलोमीटर झोळीत टाकून पायपीट
सर्व परिस्थितीत गावकऱ्यांनी अनिता यांना बांबूची झोळी तयार करून त्यात बसवले. यानंतर खांद्यावर घेऊन ७ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास सुरू केला. डोंगर- दऱ्यांमधून आणि कच्च्या रस्त्यावरून चालत ते मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर एका खाजगी वाहनाने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने अनिता आणि तिच्या नवजात बालकाची प्रकृती स्थिर आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास सुरूच
सदरची घटना आदिवासी भागातील आरोग्य सुविधांच्या अभावावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील नागरिकांच्या समस्या कधी सुटणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. या आधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.