अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली असताना नाशिकमधील काही समन्वयकांनी या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मागील आंदोलनावेळी मुंबईत आंदोलकांसाठी जेवण, पाणी आणि किराणा यासह आवश्यक रसद पुरवणाऱ्या समन्वयकांनीच यावेळी आंदोलनात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे.
जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक अभ्यासक आणि तज्ञ आहेत. मात्र त्यांचेही म्हणणे जरांगे पाटील ऐकत नसल्याचा दावा या समन्वयकांनी केला आहे. मागण्या पूर्वीच्याच आहेत, पण त्या प्रत्यक्षात कशा सुटणार, याबाबत जोपर्यंत स्पष्ट भूमिका आणि ठोस मार्ग सांगितला जात नाही, तो पर्यंत आम्ही आंदोलनात सहभागी होणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कायम मराठा समाजाची आणि मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करतात. राजकारणात जसे ते धूर्त म्हणून वागतात तसेच ते मराठा समाजाच्या मागण्यांसाठी देखील अशीच वागणूक देतात. याआधी देखील त्यांनी अनेक जीआर काढले. मात्र ते सगळे फसवे निघाले. त्यामुळे जरांगे पाटील यांनी या सगळ्याला बळी पडू नये असे आवाहन मराठा समन्वयक करण गायकर यांनी केली.
मागील आंदोलनावेळी आपण स्वतः पुढाकार घेऊन आंदोलकांसाठी जेवण, पाणी आणि किराणा यासह सर्व प्रकारची रसद पुरवली होती, असेही समन्वयकांनी सांगितले. मात्र, यावेळी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर जरांगे पाटील समर्थकांकडून सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि टीका होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, समाजाच्या प्रश्नावर आंदोलन करायचे असेल तर त्यासाठी स्पष्ट मागण्या, नियोजन आणि त्या मागण्या कशा मार्गी लागतील याचा ठोस आराखडा असणे आवश्यक आहे, अशी भूमिका नाशिकमधील या समन्वयकांनी घेतली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनापूर्वीच नाशिकमध्ये त्यांच्या भूमिकेला विरोधाचे सूर उमटताना दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.