Manoj Jarange Patil latest statement on Maratha reservation : सत्ता आणि बहुमताच्या जोरावर सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात राजकारणाची मस्ती गेली आहे. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट रचला जातोय. या सरकारचा माज उतरवणे हीच आमची पुढची दिशा असेल, अशा अत्यंत आक्रमक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले.
फडणवीसांच्या अंगात अन्याय करण्याचा किडा
देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, "फडणवीस यांच्या अंगात मराठा समाजावर अन्याय करण्याचा किडा आहे. मरेपर्यंत ते आपल्याला संपर्क करणार नाहीत किंवा मार्ग काढणार नाहीत. बावनकुळे यांच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय सुरू असून, त्यांनी केलेली चूक फडणवीस यांनी मान्य करायला हवी. तसेच, 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' असे वाटणाऱ्या नेत्यांना आता जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
शिंदेंचा पक्ष उघड्यावर पडेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "सध्या मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा आहे. मात्र, त्यांनी आपल्या मंत्र्यांना आवर घातली पाहिजे. जर मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला, तर त्यांचा पूर्ण पक्ष उघड्यावर पडेल. शिंदे यांचे ओएसडी आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून चूक सुधारण्याचे फोन येत असल्याचेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.
सातारा आणि औंध गॅझेटियरवरून कट रचल्याचा आरोप
मराठा आरक्षणाच्या नोंदींबाबत बोलताना जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये तब्बल ३ लाख नोंदी सापडल्या असून साडेसहा लाख मराठा समाज आरक्षणात जाऊ शकतो. ५८ लाख नोंदी देण्याचे कबूल केले असले, तरी सातारा आणि औंध गॅझेटियरमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असा कट रचला गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आज सधन वाटत असला, तरी भविष्यात त्यांना या गॅझेटियरची नितांत गरज भासणार आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी तिखट शब्दांत टीका केली. मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजाचे वाटोळे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोठ्या आंदोलनानंतर पुन्हा कोणीही मराठ्यांचे दाखले रद्द करण्याचे धाडस करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी कर्जमाफी, आदिवासी निधी आणि उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर चौफेर टीका करत, सर्वच समाजांनी आता जागृत होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.