विनोद पाटील, साम प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुका झाल्या असल्या तरी आता सर्वच पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. कारण पुढच्या चार महिन्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये विधानसभांच्या जागांवरील आघाडी-पिछाडीची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीनं लोकसभेच्या 30 जागा जिंकल्या आहेत.
या 30 लोकसभा मतदारसंघांमधील तब्बल 150 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआला आघाडी मिळाल्याचं पुढं आलंय. तर 17 जागा जिंकणा-या महायुतीला 125 जागांवर आघाडी मिळालीय. त्यामुळे मविआच्या नेत्यांनीही आता विधानसभेत 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत जागांनुसार मतांच्या टक्केवारीतही मोठी तफावत पाहायला मिळाली आहे.
कुणाला किती जागा, किती मतं?
काँग्रेसनं 17 जागा लढवल्या आणि 16. 92 टक्के मतांसह 13 जागा जिंकल्या.
भाजपनं सर्वाधिक 28 जागा लढवल्या आणि 26.18 मतं मिळवत 9 जागा जिंकल्या.
ठाकरे गटानं 21 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. 16.72 टक्के मतं मिळवून 9 जागांवर विजय मिळवला.
शरद पवार गटानं केवळ 10 जागा लढवल्या. 8 जागा जिंकून 10.27 टक्के मतं मिळवली.
शिंदे गटानं 15 जागांवर उमेदवार दिले होते. यातल्या 7 जागा जिंकत 12.95 टक्के मतं मिळवली.
अजित पवार गटानं 4 जागा लढवून 1 जागा जिंकली आणि 3.60 टक्के मतं मिळवली.
मविआला मिळालेल्या जागा आणि मतांचा टक्का वाढलाय. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. आगामी निवडणुकीत हाच ट्रेंड राहिला तर त्यांना स्पष्ट बहुमत मिळू शकतं. त्यामुळे मविआच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.