पालघर आणि नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई, रायगड, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी.
माथेरान, अंबरनाथ आणि वसईत मुसळधार पावसाची नोंद.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांत पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. हवामान विभागाने पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून, अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वातावरणात पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर ठाण्यातील अंबरनाथ आणि पालघरमधील वसई येथे प्रत्येकी १०० मिलीमीटर पाऊस पडला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नंदूरबार आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, ब्रह्मपुरी येथे काल ३३.३ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदले गेले. काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उर्वरित महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलक्या सरी पडत राहतील, तर काही भागात सूर्यप्रकाशाची उघडीपही दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.