सांगलीवाडीतील कार्यक्रमात जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी
खासदार विशाल पाटलांना चिमटा काढत केलेलं मिश्किल भाष्य
वक्तव्यावरून व्यासपीठावर व प्रेक्षकांत हशा पिकला
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
सांगलीत कार्यक्रमात माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत तुफान फटकेबाजी केली आणि उपस्थित प्रेक्षक तसेच नेत्यांना खळखळून हसवले. सांगलीवाडी येथे झालेल्या होड्यांच्या स्पर्धेच्या जाहीर कार्यक्रमादरम्यान त्यांनी खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढत एक भाष्य केलं. “नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये,” असा टोमणा त्यांनी मारला. सांगलीतील अनेकांच्या पक्षप्रवेशावरून पाटील यांनी हा संदर्भ घेतला आणि अप्रत्यक्षरीत्या राजकीय हालचालींवर भाष्य केलं.
या कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांनी मिश्किलपणे पुढे म्हटले की, “आमच्यातले अनेकजण आता तिकडे गेले आहेत, आणि त्यांना तिकडे जाण्यासाठी कदाचित विशालनेच सांगितले असेल. विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही.” त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण कार्यक्रमात एकच हशा पिकला.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात अनेक नेत्यांनी विविध पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. या हालचालींवरून स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे इशारा देत सांगितलं की, “नदीत होड्यांची संख्या वाढली की, कुणीतरी काठ धरून ठेवणं गरजेचं असतं.”
दरम्यान काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर खोचक टोला लगावला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगलीचे राजकारण कसं असेल? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.