अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या
सुनील तटकरे यांनी लिखित प्रस्तावाशिवाय चर्चा शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले
माध्यमांमार्फत नव्हे तर अधिकृत प्रस्ताव आल्यावरच चर्चा होईल असे ते म्हणाले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केले. 'जोपर्यंत लिखित प्रस्ताव येत नाही तोपर्यंत विलिनीकरणावर चर्चा शक्य नाही.', असे मत सुनील तटकरे यांनी साम टीव्हीला दिलेल्या 'ब्लॅक अँड व्हाइट' या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.
सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'एक तर दादांच्या अकाली निधनानंतर राजकीय समिकरणं बदलल्याचे चित्र दिसत आहे. अशावेळी नव्याने त्यासंदर्भातील चर्चा सुरू व्हायची असेल तर समोरून प्रस्ताव आला पाहिजे. नेमकं विलिनीकरण कशापद्धतीने होणार?, काय अपेक्षित आहे?, काय अपेक्षित नाही? हे जर का समोरून आले तर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण बसून चर्चा करून. पण ते जर का आलेच नाही तर मग कुठे प्रश्न उद्भवेल. तो प्रस्ताव येऊ द्या तर खरं मग विलिनीकरणाच्या बाबतीत चर्चा करू. प्रस्ताव हा माध्यमांच्या मार्फत नको तर तो यायचा झाला तर अधिकृतच यावा लागेल.'
विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यानंतर नेतृत्व कुणाचे असेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कायम राहिल? या प्रश्नाचे उत्तर देताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'विलिनीकरणाची चर्चा सुरू करायची असेल तर त्यामध्ये काय अभिप्रेत आहे हा प्रस्ताव आला पाहिजे. त्या प्रस्तावात हे सगळं येईलच. दादा असतानाची परिस्थिती भिन्न होती. दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते. कदाचित त्या चर्चेत काय चर्चा झाली असेल ते मला माहिती नाही. प्रस्ताव आल्यानंतर सर्व बाबी समोर येतील.'
जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र जाण्याचे ठरवले होते. राष्ट्रवादीची शक्ती म्हणून विचार केला तर दोन्ही एकत्र आल्यानंतर एक मोठी शक्ती निर्माण होऊन तुम्ही राज्यात एक मोठा पर्याय म्हणून उभे राहू शकता का? या प्रश्नावर उत्तर देताना तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की, 'महानगर पालिकेला सुद्धा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले. त्यामध्ये अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. त्यामध्ये दुसरा टप्पा म्हणून ज्यावेळी एक व्हिडीओ प्रसिद्ध होत आहे त्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा झाल्याचे दाखवण्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या बैठकीनंतर दादांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. तेव्हा दादांनी मला फोन करून जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढवण्याची चर्चा झाली. बहुतेक ठिकाणी घडाळाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याचा होकार आला असे ते म्हणाले होते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.