Summary -
धाराशिव दौऱ्यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली.
अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी असे वक्तव्य त्यांनी केले.
साखर संघाच्या अहवालात मोदी-शहा यांचा फोटो नसल्याच्या मुद्दावरून टीका.
विखे पाटलांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
जनाची नाही तर म्हणाची ठेवा असं म्हणत शरद पवारांवर टीका करताना भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. साखर संघाच्या अहवालात पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो अन् अभिनंदनाचा ठराव न घेतल्याने आपण अजित पवारांना खडेबोल सुनावल्याचा गौप्यस्फोट विखे पाटील यांनी केला आहे. धाराशिव येथील एका शासकीय कार्यक्रमात साखर कारखानदारीच्या धोरणावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील भाषण करताना म्हणाले की, 'आज राज्याची सध्यस्थिती काय आहे. आज आपण पीएम मोदीसाहेब आणि अमित शहा यांचे अभिनंदन केले पाहिजे. या लोकांनी इथेनॉलचे धोरण आणले म्हणून आज आपले साखर कारखाने टिकून आहेत. आपल्या इथे काय झालं नुसत्या फाईल दिल्या. चला दिल्लीला. गेल्या वर्षी आमची मिटिंग होती साखर कारखाण्यासंदर्भात की कारखाने कधी सुरू करायचे. त्यावेळी साखर कारखाना संघ आणि मंत्रिमंडळात बैठक झाली. तेव्हा अजित पवार काही आपल्या मंत्रिमंडळात नव्हते.'
त्यांनी पुढे सांगितले की, 'या बैठकीत मी अजित पवारांना एकच प्रश्न विचारला की आज कारखानदारी इथेनॉल धोरणामुळे टिकली की नाही? तर ते म्हणाले टिकली. मी म्हणालो कुणामुळे टिकली? ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले म्हणून टिकली त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक अहवालामध्ये आहेत का? अभिनंदनाचा ठराव केला का? तर ते नाही म्हणाले. तेव्हा मी म्हणालो जनाची नाही तर मनाची ठेवा. ज्यांनी आपल्याला जीवदान दिले त्याची तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपले वाटोळं केलं त्यांचे फोटो तुम्ही वापरून मोठे झाले.' असे म्हणत विखे पाटील यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. विखे पाटील यांनी भरसभेत हा मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
धाराशिवच्या दौऱ्यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 'अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या आमच्या जाणत्या राजाने माझा महाराष्ट्र उपाशी ठेवला. फक्त एकमेकांची जिरवायची आणि घरे फोडायची कामं त्यांनी केली.', अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तसंच, अनेक वर्षे राज्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केले. चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाकडे त्यांचे दुर्लक्ष राहिले.', असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.