रायगडमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातलीत झपाट्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. धोकादायक परिस्थिती नसली तरी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. केंद्रीय जल आयोगाकडून प्रमुख नद्यांची पाणी पातळी, प्रवाह यांची मापणी केली जात आहे. काउंटर आणि कर मशीनच्या सहाय्याने सध्या नद्यांची पाणी पातळी आणि पाण्याचा प्रवाह मोजला जात आहे.
कला ही केवळ सौंदर्याची अभिव्यक्ती नसून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे प्रभावी माध्यमही ठरू शकते. पुण्यातील हिंगणे खुर्द परिसरात झाडाला टांगलेल्या जुन्या चपला, दोर आणि लाल रंगाचे शिंतोडे पाहून अनेकांनी सुरुवातीला हा प्रकार अंधश्रद्धा, करणी किंवा भानामतीशी संबंधित असल्याचा समज करून घेतला. मात्र, प्रत्यक्षात ही शेतकरी आत्महत्यांच्या वेदनेवर भाष्य करणारी एक प्रभावी इन्स्टॉलेशन आर्ट असल्याने बळी अस्तित्वाच्या खुणा' या परफॉर्मेटिव्ह इन्स्टॉलेशनद्वारे तरुण कलाकार सुशील बनसोडे याने बळीराजाच्या मूक आक्रोशाला कलात्मक अभिव्यक्ती दिली आहे.
नेपाळ मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३०० नागरिकांचा मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिनी दूतावास यांच्याकडून परमिट म्हणजेच परवाना मिळाल्यानंतर आज दुपारपर्यंत हे सर्व भाविक चिनी सीमा ओलांडणार आहेत. ४ दिवसांपूर्वी नेपाळ मध्ये महाराष्ट्राचे भाविक अडकले असल्याची बातमी सर्वात प्रथम "साम टिव्ही" ने दाखवली होती. या बातमीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून चिनी दूतावासाशी संवाद साधल्यानंतर आता भाविकांचा पवित्र असलेल्या मानसरोवर यात्रेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत भाविकांनी साम टिव्ही चे सुद्धा आभार मानले आहेत..
पर्यटन नगरीत पावसाची दमदार बॅटिंग सुरू होताच लोणावळ्याचा निसर्ग पुन्हा एकदा बहरून आलाय. डोंगररांगा धुक्याच्या दुलईत हरवल्या आहेत, तर कडेकपाऱ्यांतून शुभ्र धबधबे फेसाळत कोसळू लागले आहेत. या नयनरम्य दृश्यांनी पर्यटकांना भुरळ घातली असली, तरी या सौंदर्याला धोक्याचीही किनार आहे. सहारा ब्रिज परिसरातील धबधब्यावर अनेक पर्यटक जीवाची पर्वा न करता उंच डोंगरावर चढून सेल्फी आणि रील्सच्या मोहात धोकादायक पर्यटन करताना दिसत आहेत. सततच्या पावसामुळे डोंगरावरील वाटा निसरड्या झाल्या असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणावळा नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही पर्यटकांकडून सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे
लातूर उदगीर महामार्गावर अजणसोंडा पाटीजवळ कार, ऑटो व मोटरसायकलचा तिहेरी अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
उदगीरहून लातूरकडे जाणारी कार ,ऑटो आणि बाईक यांचा तिहेरी अपघात झाला आहे. यामध्ये प्रद्यूम्न माचवे (वय ३५) रा. नळेगाव , कावेरी माचवे (वय ३०) रा. नळेगाव , गोपाळ माने (वय ३५) रा. उदगीर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. २ जुलैपर्यंत विभागात जून ते सप्टेंबर या वार्षिक हंगामातील सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत १२७.६ मि.मी पावसाची नोंद झाली. ६७९ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी असून सरासरीच्या ८७.४ टक्के ते प्रमाण आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२० मि.मी., जालना जिल्ह्यात १३४, बीड १२२, लातूर १०५, धाराशिव १३०, नांदेड, १४५, परभणी ११४, हिंगोली १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २ जुलैच्या अहवालानुसार एका दिवसात ६.४ मि.मी. पावसाची नोंद विभागात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत मराठवाड्यात १४३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ११८.७ मि.मी. पाऊसझाल्याने मागील वर्षाच्या तुलनेतही पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. पहिल्या पावसा पासून आजही हि परिस्थिती कायम आहे. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामधुन मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोठी अवजड वाहन एकच वेळी या ठिकाणी आल्यानंतर वादाचा आणि अपघाताचा धोका संभवतो आहे. सातत्याने महामार्गावर साचत असलेल्या या पाण्याकडे आणि येथे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्टेशनजवळील मद्रासी पाडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या नाल्या शेजारी असलेल्या एका दुकानाची भिंत मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक साक्षी सुर्वे यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कळवले.यानंतर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. धोकादायक बांधकाम तातडीने हटवण्यासाठी महानगरपालिकेची जेसीबी मागवून तोडकामाचे आदेश देण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शहरातील नाल्यांवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे येत्या आठ दिवसांत हटविण्यात येतील, अशी ग्वाही महापौर अश्विनी निकम यांनी यावेळी दिली.
हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात चार जुलैपर्यंत येलो अलर्ट जाहीर केलाय या काळात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता हा अंदाज खरा ठरलाय गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली यात 47 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली कमी वेळात बरसलेल्या या पावसाने मात्र शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये रिमझिम पाऊस सुरू असला, तरी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन अशा एकूण नऊ जलाशयांतील पाणीसाठा अत्यंत खालावला असून, जुलै महिना सुरू असतानाही ही धरणे जवळपास कोरडी आहेत. दरवर्षी याच कालावधीत ३० ते ३५ टक्के भरलेली असणारी धरणे यंदा रिकामी असल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये खरीप हंगाम, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तरच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.