महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत ठरणार
शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी, अंबादास दानवे यांची नावे चर्चेत
तिन्ही पक्ष एकत्र येऊन एकच उमेदवार देणार
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महायुतीकडे ६ जागा आणि महाविकास आघाडीकडे १ जागा आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जय पवारांचे नाव फायनल झाले आहे तर शिंदेसेनेचा देखील उमेदवार आज ठरेल. आता महाविकास आघाडीकडून कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार देखील आज ठरणार आहे. ५ जणांची नावं सध्या चर्चेत आहेत. यामधील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल हे आज स्पष्ट होईल. राष्ट्रवादीकडून शरद पवार, ठाकरेसेनेकडून प्रियंका चुतुर्वेदी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि काँग्रेसकडून एक-दोन जण इच्छुक आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत सांगितले. 'राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचे नाव निर्णय जाहीर होईल.' असे त्यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले की, 'ही जागा महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी एकत्र असेल तेव्हाच ही जागा निवडून येईल. शिवसेना हा विधिमंडळात महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे २० आमदार असून काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे १० आमदार आहेत. आम्ही जेव्हा एकत्र राहून तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणे गरजेचे आहे.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ५ मार्च हा शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अद्याप मविआकडून नाव फायनल झाले नाही. अजूनही त्यांच्यामध्ये बैठकाच सुरू आहे. संजय राऊत यांनी पुढे असेही सांगितले की, 'काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल. आघाडी असल्याने कोणताही एक पक्ष यासंदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही. जागा कुणी लढायची हा आघाडी म्हणून निर्णय जाहीर केला जाईल. निर्णय जाहीर करणे कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही. तीन पक्ष एकत्र येऊन त्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर केला जाईल.'
'दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तिन्ही पक्षात चर्चा, संवाद सुरू आहे आणि तो संपलेला नाही. जे काही होईल ते एकमताने होईल. तीन पक्ष तीन स्वतंत्र उमेदवार उभे करू शकत नाहीत. एकच उमेदवार उभा राहील आणि तो एकमेकांच्या संमतीने उमेदवार उभा राहील. सातवी जागा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही.', असेही संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.