Summary -
विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर चर्चा
लाडकींना २१०० रुपये कधी मिळणार? जयंत पाटील याचा सरकारला सवाल
योजना बंद होणार नाही, योग्य वेळी २१०० रुपये देऊ, असे एनकनाथ शिंदे म्हणाले
एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना खडेबोल सुनावले
लाडकी बहीण योजनेबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारला लाडकींना २१०० रुपये कधी देणार? सवाल केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत. विरोधकांवरच निशाणा साधला. यावेळी'लाडक्या बहिणींना योग्यवेळी २१०० रुपये देऊ.', असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये कधी मिळणार? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. तसंच भास्कर जाधव यांनी देखील या योजनेमुळे फसवणूक झाल्याचा आरोप केला. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले की, 'लाडकी बहिणींना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार असे तुम्ही बोलत आलात. पण ही योजना बंद होणार नाही. योजना बंद व्हावी म्हणून हे कोर्टात गेले. आम्ही चांगल्या भावनेने योजना सुरू केली. तुम्ही कोर्टात गेला, तुम्हाला चपराक मिळाली. आचारसंहितेमध्ये लाडकींना पैसे देणं बंद होईल असेही तुम्ही म्हणाले. पण आम्ही अतिरिक्त पैसे टाकून लाडक्या बहिणींना दिले. कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.'
तसंच, 'लाडकी बहीण योजनेबाबत आम्ही जे काही बोललो आहोत ते योग्य वेळी पूर्ण करू. लाडक्या बहिणींनी तुम्हाला विधानसभेत चांगला जोडा दाखवला. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. यापुढे तुम्ही लाडक्या बहीण योजनेबाबत काही बोलू नका. लाडक्या बहिणींविरोधात बोलू नका. आम्ही ही योजना सुरू केली. ही योजना सुरू करायला हिंमत आणि धाडस लागते. योग्य वेळी आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ.ही योजना कधीही बंद होणार नाही.' , असे एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडसावून सांगितले.
तर, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या योजनेबाबतचे अपडेट सभागृहात दिले. यावेळी त्यांनी बोगस लाडक्या बहीणींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. तसंच, आतापर्यंत २ कोटी ४३ लाख लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले असल्याचा आकडा सांगितले. ई -केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. तसंच, 'पहिल्यांदा लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली. या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेला १ वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला आहे. त्रुटी आणि सुधारणा यावर आम्ही काम करत आहोत.', असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेला माणूस दोन नंबरला गेला असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'राज्यसरकार आल्याने लाडक्या बहिणींचा फायदा झाला. पण आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरवर येऊन बसला. एकनाथ शिंदे यांचे या असल्या लोकांमुळे नुकसान झाले. ज्या माणसाने ही योजना आणली त्याच्यावर अन्याय होतोय.', असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.