Solapur News : जिल्हाधिकारी, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते मंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अर्ज - विनंती केल्या. तरीही घर मिळेना ना राहायला घर ना वेळेवर कलावंतांचे मानधन मिळेना मदतीसाठी 'कोल्हाट्याचं पोर' कार डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या आईंची मदतीसाठी वर्षानुवर्षे भटकंती सुरूच आहे. अशा परिस्थितीत "सांगा कसं जगायचं ?" आणि या ज्येष्ठ कलावंतास "कुणी घर देता का घर" असा आर्त टाहो ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांनी फोडला आहे. (Latest Marathi News)
'कोल्हाट्याचं पोर' या आत्मचरित्राचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा दिनांक 19 फेब्रुवारी 2007 रोजी वयाच्या 37 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. मोठा आधार कोसळला. चाळीस वर्षे लावणी (Lavani) कला जोपासणाऱ्या आणि या लावणीच्या बळावर मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत.
निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे 1500 रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. भाड्याने तर कधी इतरत्र राहावे लागते. भाडं द्यावं की पोट भरावं असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा विदारक परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावं लागत आहे.
सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी साडेचार वर्षांपूर्वी शांताबाई काळे यांना घर देण्याचे कृतीशील आश्वासन दिले. तेवढ्यावरच न थांबता डॉ. भारुड यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले.
त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध केली. त्या जागेच्या उताऱ्यावर शांताबाई काळे यांचे नावही लागले. बांधकाम सुरू झाले होते. दरम्यान, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली त्यानंतर मात्र अचानकपणे विविध अडचणीमुळे हे बांधकाम खोळंबले आहे. प्रशासकीय स्तरावरही संबंधित अधिकार्यांकडून दुर्लक्ष झाले.
त्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून अर्ज विनंती केली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी पाठपुरावा केला.
आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनाही निवेदन दिले. आश्वासनापलीकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही.
तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही पत्र लिहिले होते. राज्यपाल कार्यालयाकडून सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांना शांताबाई काळे यांचे राहायला घर आणि उदरनिर्वाहाची तजवीज या मागणीविषयीचे पत्र उचित कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात आले होते. मात्र मराठी भाषा विभाग यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, अशी व्यथा शांताबाई काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
"स्वतःच्या हक्काच्या घरात मरण यावे" हीच शेवटची इच्छा !
मुलाच्या निर्णयानंतर उदरनिर्वाचा प्रश्न गंभीर झाला हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. संघर्ष करावा लागत आहे. आणखी किती हेलपाटे मारायचे ? 69 वर्ष वय असताना आता पुढे हेलपाटे मारणे शक्य नाही. आता तरी मुख्यमंत्री व शासनाने हक्काचं घर मिळवून द्यावे आणि स्वतःच्या हक्काच्या घरात मरण यावं, अशी शेवटची इच्छा शांताबाई काळे यांनी व्यक्त केली.
हक्काचे घर मिळावे, जेष्ठ कलावंत म्हणून वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी वर्षानुवर्ष कागदपत्राची बॅग सोबत घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. ज्येष्ठ कलावंतास "कुणी घर देता का घर" असाच अर्थ टाहो शांताबाई काळे या फोडत आहेत तेव्हा आता तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.