जळगाव : राज्यातील जिल्हा परिषदांच्या गटांची संख्या वाढवण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्हा परिषदेचे दहा गट अर्थात सदस्य संख्या दहाने वाढत आहे. गट वाढल्यामुळे पंचायत समिती सदस्य अर्थात गणांची संख्या वीसने वाढणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ आहे. परंतु, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्याचे प्रस्तावित आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देखील देण्यात आली आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषदांची निवडणूक नवीन गट रचनेनुसार होणार हे मात्र निश्चित आहे.
लोकसंख्येनुसार सदस्य संख्या
राज्य निवडणूक आयोग जिल्ह्यातील निर्वाचक गटांतून थेट निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करील. तथापि, एखाद्या जि. प.च्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणुकीद्वारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण शक्य असेल तिथपर्यंत राज्यभर सारखेच असेल. ५५ निर्वाचक गटांची किमान संख्या राज्यातील जिल्ह्यांमधील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांसाठी नियत वाटप करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यांची लोकसंख्या विचारात घेऊन, त्या जिल्ह्यासाठी विशेष सूत्राचा अंगीकार करून काढलेल्या प्रत्येक लोकसंख्येसाठी अतिरिक्त निर्वाचक गट असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
येथे वाढतील गट
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे दोन, अमळनेर, चोपडा, रावेर, जामनेर, धरणगाव येथे प्रत्येकी एक गट वाढतील असा अंदाज असून बोदवड, मुक्ताईनगर येथे गट वाढणार नसल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. तर जळगाव जिल्हा परिषदच्या आगामी निवडणुकीत १० गट व पंचायत समितीचे २० गण वाढणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेसाठी सध्या ६७ गट असून ते दहाने वाढून ७७ होतील. तर गणांची संख्या देखील १३४ वरून १५४ होतील असे सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.