हिंगोलीतील सावरखेडा येथे भीषण अपघात
उभ्या ट्रकला डिझायर कारची जोरदार धडक
दोन तरुणांचा मृत्यू, कारचा चुराडा
महामार्ग सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
निष्काळजीपणावर कारवाईची मागणी
संदीप नागरे, हिंगोली
हैदराबाद–अकोला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी परिसरातील सावरखेडा गावाजवळ हा अपघात झाला असून, या दुर्घटनेत कळमनुरी शहरातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर एक नादुरुस्त ट्रक अतिशय धोकादायक पद्धतीने रस्त्यावरच उभा करण्यात आला होता. संबंधित ट्रकचालकाने कोणतीही सुरक्षितता न पाळता ट्रक रस्त्याच्या मध्यभागीच उभा करून त्याची दुरुस्ती सुरू केली होती. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी इतर वाहनचालकांना ट्रक दिसावा यासाठी आवश्यक असलेले रेडियम, सिग्नल लावण्यात आले नव्हते.
याचदरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या डिझायर कारने या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अडीच तासांचा कालावधी लागला. या अपघातात सूरज सावळे (वय २६) आणि आणखी एक तरुण अशा दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दोघेही कळमनुरी शहरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित ट्रक दोन दिवसांपासून याच ठिकाणी उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेचे नियम पाळले जातात का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. महामार्ग पोलिस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाल्याचा आरोपही केला जात आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.