हिंगोली : मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा तडाखा हिंगोली जिल्ह्याला देखील बसला असून यात प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यात रीप व बागायती मिळून पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी विविध ठिकाणी शेती नुकसानीची पाहणी केली. या नंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं. तर या नुकसानीमध्ये सर्वाधिक सोयाबीन या पिकांचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगळं पॅकेज द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तीस मिनिटात झेंडू शेती उध्वस्त
हिंगोलीत महापुराच्या संकटानंतर शेतकऱ्यांना चक्रीवादळाचा देखील फटका बसला आहे. सेनगाव तालुक्यातील सिंदगी परिसरात तीस मिनिटांमध्ये शेतकऱ्याची डौलाने उभी असलेली झेंडू शेती भुईसपाट झाली आहे. दसरा- दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी ही शेती फुलवली होती. व्यापाऱ्यांनी प्रति किलो ३० ते ४० रुपये दराने झेंडूच्या फुलांची शेती खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत बोलणी देखील सुरू केली. मात्र मध्यरात्री अचानक वादळी वारा व पावसाचा मारा झाल्याने शेकडो हेक्टरवरील झेंडूची झाडे जमिनीवर आडवी झाली.
कयाधू नदीला पुन्हा पूर
हिंगोलीतील कयाधू नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. मागच्या पंधरा दिवसात दहा वेळा नदीला पूर आल्याने शेत शिवारातील आखाड्यावरील साहित्य वाहून गेले आहे. तर सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर शिवारात शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून शेतात खोदलेली पाईपलाईन खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीत शेतकरी हवालदिल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.