नाशिक - आजोबांच्या इच्छापूर्तीसाठी नातवाच्या लग्नचं वऱ्हाड थेट बैलगाडीतून नेण्याचा अनोखा प्रसंग त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल परिसरात पाहायला मिळाला. यामुळे या अनोख्या विवाहाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. हरसूलच्या बळीराजाने आपल्या मुलाच्या लग्नचं वऱ्हाड आलिशान गाड्यांऐवजी आदिवासी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्यांवर नवरीच्या 12 किलोमीटरवरील शिरसगावला वाजत गाजत नेत विवाह सोहळा पार पडला. हरसूलचे नवरदेव पद्माकर कनोजे यांचे आजोबा शेतकरी होते.
हे देखील पाहा -
त्यांना मुलगा पुंडलिक कनोजे यांचे वऱ्हाड बैलगाडीने न्यायचे होते. मात्र कुंडलिक कनोचे यांच्या लग्नाचं वऱ्हाड बैलगाडीतून काही कारणांमुळे नेता आले नव्हते. दरम्यान पुंडलिक कनोजे यांनी मुलाचा विवाह शिरसगावच्या मोहनदास साबळे यांची कन्या विजया हिच्याशी निश्चित केला होता. त्यावेळी आजोबांच्या इच्छापूर्तीसाठी वऱ्हाड बैलगाडीतून नेण्याचं ठरलं. त्याप्रमाणे मित्र आणि नातेवाईकांनामार्फत जास्तीत जास्त बैलगाड्या शोधून त्यांची रंगरंगोटी करून सजवण्यात आल्या.
याचबरोबर बैलांना देखील पोळ्याप्रमाणे रंगरंगोटी करून सजवण्यात आलं. त्यानंतर नवरदेव पद्माकरसह पंचवीस बैलगाड्यांमधून हरसुलहून वऱ्हाड शिरसगावला पोहोचले. यावेळी त्र्यंबक इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी नवरदेवाच्या बैलगाडीचे सारथ्य केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या लग्नाच्या वऱ्हाडाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.