राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
अंतिम प्रभाग रचना 4 मे रोजी जाहीर होणार
बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार
नगर पालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकेनंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. येत्या शुक्रवारपासून या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना 4 मे रोजी जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या डिसेंबरपर्यंत संपणार आहे. यातील काही ग्रामपंचायतींवर प्रशासक यंत्रणा आहे, त्यांचीही मुदत डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतींचा अधिनियम,1958 मधील 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.22 अन्वये कलम 10 मधील सुधारीत केलेल्या तरतुदीनुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
दरम्यान प्रभाग रचनेचे संपूर्ण कार्यक्रम अंतिम होण्यासाठी उन्हाळातील मे महिना उजाडेल. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती आणि आक्षेप मागवून काही दिवसांनी अंतिम मतदार यादी जाहीर केल्या जातील. तोपर्यंत पावसाळा सुरू होईल, त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी दिवाळीत मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करुन प्रत्येक गावाचे नकाशे २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम करणे.
संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे. त्यांची सीमा निश्चित करण्यात यावी.
प्रारुप प्रभागरचनेची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी व संबधित मंडल अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नेमण्यात येणार. समिती ५ मार्चपर्यंत प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणार.
या समितीला प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी ११ मार्चपर्यंत सादर करावा लागेल. जिल्हाधिकारी हे नमुना ब (प्रारुप प्रभाग रचना) ची संक्षिप्त तपासणी करतील. जर त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून संबंधित प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी १७ मार्चपर्यंत पाठवतील.
राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी आवश्यक असल्यास त्या प्रस्तावात दुरूस्ती करेल किंवा त्यास २३ मार्चपर्यंत मान्यता देईल. या दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी. समितीच्या सर्व सदस्यांनी ३० मार्चपर्यंत स्वाक्षरी करावी, असे या अधिसूचनेत म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.