भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्राणज्योत मालवली. ते ८४ वर्षांचे होते. मागिल दीड महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. मधुकरराव यांचं नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा पिचड यांचा राजकीय प्रवास होता. त्यांच्यावर आदरांजली वाहत अनेक नेत्यांनी दुख: व्यक्त केलं.
भूमिपुत्रांचा कैवारी हरपला म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुख: व्यक्त केलं, 'ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचे एक प्रदीर्घ पर्व जणू संपले. आदिवासी कुटुंबातच जन्म घेतलेल्या मधुकररावांनी साठीच्या दशकाच्या प्रारंभाला दूध संघाची निर्मिती करुन समाजकारणाचा वसा घेतला. काही काळ ते ठाण्याचे पालकमंत्रीही होते. त्यांच्यातला आदिवासींचा सजग कैवारी मला जवळून पाहायला मिळाला. मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच, पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. भावपूर्ण श्रध्दांजली.'
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, 'माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या पिचड यांनी पक्षासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल.'
आदिवासी समाजाचं फार मोठं नुकसान झालं, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी शोक व्यक्त केलं. 'सर्वसामान्य आणि आदिवासी समाजाचं फार मोठं नुकसान झालं आहे. पिचड यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका आदिवासा भागात प्रचंड होता. राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष म्हणून नेत्तृव केलं. आदिवासी मंत्री होते. पालकमंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलं. शेवटच्या काळात ते भारतीय जनता पार्टीत होते. राजकारणात सक्रिय होते. मिळून मिसळून राहणारे एक समंजस नेता आज आपल्यात नाही. आम्ही त्यांच्या कुंटुबाच्या दुखात सामील आहोत.'
मधुकर पिचड यांच्या आठवणींना उजाळा देत, नरहरी झिरवळ म्हणाले, 'मला त्यांच्या सानिध्यात काम करायला मिळालं. मी त्यांच्यासोबत काम जरी केलं असलं तरी, ते माझे सीनियर होते. ते फक्त आदिवासी यांचे नेते नसून, इतर मागासवर्गीयांचा आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. आम्ही त्यांना आदर्श म्हणून पाहतो. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. २ ऑक्टोबर महात्मा जंयतीच्या दिवशी आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनात, रणरणत्या उन्हात आंदोलनाचे प्रमुख म्हणून २ तास बसले.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.