धाराशिव जिल्ह्यात वाघ आढळला असल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी हद्दीत एका गायीवर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यावेळी वाघाने हल्ला केल्याचं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याकडून सांगण्यात आलं होत. मात्र यावर वन विभागाने पुष्टी केलेली नव्हती. मात्र आता हल्ला करणारा वाघच असण्याची शक्यता आहे. या
या परिसरात यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांत दहशत पसरली होती. मात्र आता बिबट्याच्या मागावर असलेल्या वन विभागाला आता येडशी परिसरात वाघाचा संचार असल्याची माहिती मिळाली आहे. एका ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ दिसून आला असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरातील प्राण्यांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. हे हल्ले बिबट्याकडून होत असल्याचा अंदाज असल्याने या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने येडशी परिसरात १५ ट्रॅप कॅमेरे लावले होते. यातील एका ट्रॅप कॅमेऱ्यात शुक्रवारी रात्री वन विभागाला वाघ दिसला. जिल्ह्यात प्रथमच वाघ दिसल्यामुळे वन विभाग चक्रावून गेले आहे. धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात एकदाही वाघ आढळलेला नव्हता. त्यामुळे आधीच बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत असलेले शेतकरी आता वाघाच्या भिती खाली आहेत.
येडशी येथे ट्रॅप कॅमेऱ्यात गुरुवारी कैद झालेला वाघ हा अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा असण्याची शक्यता वन्यजीव विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार व शनिवारी कोठे हल्ला झाला नाही. तसंच ट्रॅप कॅमेऱ्यातही वाघ कैद झाला नाही. तरी या वाघावर नजर ठेवता यावी, यासाठी वन्यजीव विभागाकडून ट्रॅप कॅमेऱ्याचे सेल दोन दिवसाला बदलण्यात येत असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. धाराशिव-बार्शी रस्त्यावरील धाराशिवच्या सीमा हद्दी कमानीजवळच्या ट्रॅप कॅमेरात हा नर वाघ शुक्रवारी रात्री उशिरा दिसून आला. सध्या वन विभागाकडून या वाघाच्या मागावर पथक लावण्यात आलेलं असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या हा वाघ रामलिंग अभयारण्याच्या आसपासच असून तो यवतमाळच्या टिपेश्वरमधून आल्याची शक्यता आहे. त्याने साधारण ५०० किलोमीटरचा प्रवास केल्याची शक्यता आहे. वाघ आलेल्या मार्गे परत जाण्याचीही शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हा वाघ ८ ते १० दिवसांपूर्वी येडशीत आल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. किंवा कर्नाटक राज्यातून देखील हा वाघ याठिकाणी आला असल्याचा अंदाज आहे.
रामलिंग अभयारण्यात सध्या मुबलक पाणी आणि शिकारीसाठी इतर वन्य प्राणी असल्यामुळे याठिकाणी वाघ थांबला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, वाघाला परिस्थितीशी जुळवून घेता येत नसल्यामुळे या भागातून हा वाघ स्वतः निघून जाईल असंही वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्यातरी या वाघाच्या प्रत्येक हालचालींवर वन विभाग लक्ष ठेऊन असल्याचं दिसून येत आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरं अभयारण्य परिसरात चारण्यासाठी आणू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघ आढळून आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबर वन अधिकारी देखील गोंधळून गेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील वातावरण याआधी कधीही वाघासाठी अनुकूल नव्हते. 1970 च्या दशकात मराठवाड्यात शेवटचा वाघ आढळला होता. तर 1930 ला बीड जिल्ह्यात वाघाचं दर्शन झालं होतं. धाराशिवमध्ये मात्र पहिल्यांदाच वाघ दिसला आहे. त्यामुळे वन विभागाकडून सध्या तरी फक्त नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.