विधानसभेत महाविकास आघाडीला धोबीपछाड देणाऱ्या महायुतीत आलबेल नाहीये. युतीमध्ये मंत्रिपदावरून अंतर्गत वाद सुरू झालाय. मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिंदे गट आता महत्त्वाच्या खात्यांसाठी दबावतंत्र अवलंबले असून आज संध्याकाळापर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्रिपद आणि इतर खात्याच्या वाटपावरून महायुतीत काहीच वाद नसल्याचं म्हटलं जात असलं तरी युतीत वाद आहे, हे सत्ता स्थापनेला होणाऱ्या विलंबावरून दिसून येत आहे.
सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री हे साताऱ्यातील आपल्या दरे गावाला गेले आहेत. निवडणुकीच्या प्रचारानंतर विश्रांतीसाठी ते गावी गेल्याचं नेत्यांकडून सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे हे जेव्हा मोठा निर्णय घेणार असतात त्यावेळी ते दरे गावाला भेट देतात, असं आमदार संजय शिरसाट म्हणालेत, त्यामुळे आज संध्याकाळी काहीतरी मोठी घडामोड होणार असल्याचा अंदाज आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मविआ आणि महायुतीत मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही आघाड्यांमध्ये वाद आधीपासून होताच. सर्व काही सुरळीत चालू आहे, असं सांगणाऱ्या महायुतीमध्ये मंत्रिपंदावरून ओढाताण सुरू झालीय. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापन होणे अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्रीपदावरून महायुतीच्या सरकारचं घोडं अडलंय. मुख्यमंत्रिपद शिंदे गटाला मिळाले पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेंसह गटातील प्रमुख नेत्यांनी केली होती.
मात्र दिल्लीतील बैठकीत अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं म्हणत त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याला पसंती दिली. तर शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार, असा निर्णय या बैठकीत झाला. अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी त्याला नकार दिला.
मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीतील नेत्यांची अडीच तास चर्चा झाली. त्यात कोणाला कोणती आणि किती मंत्रिपदे दिले जातील यावर चर्चा झाली. मात्र यावर शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. जर उपमुख्यमंत्रिपद शिंदे गटाला देणार असाल तर गृहखात्यासह मुख्य खाती आपल्याला द्यावीत, यासाठी शिंदे गटाकडून आता दबाव आणला जात आहे. महायुतीने शिंदेच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली. मात्र निकालनंतर चित्र बदललं आणि युतीत वाद सुरू झाला.
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असला तरी शिंदे आता अजित पवारांपेक्षा जास्तीची मंत्रिपदं आणि केंद्रीय मंत्रीपदं पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्लीत फडणवीस आणि अजितदादा यांची एक तर शिंदे आणि शाहा अशा दोन बैठका झाल्या. यानंतर शिंदे नाराज असल्याचं दिसून आलं. सत्ता स्थापनेप्रकरणी मुंबईत बैठक होणार होती, मात्र ही बैठकीकडे पाठ फिरवत एकनाथ शिंदेंनी आपला मुक्काम दरे गावात हलवला. आज आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याचं संकेत दिलेत.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या समर्थकांकडून मराठा मुख्यमंत्री देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर शिंदे हे दरे गावाला गेले. परंतु भाजप मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडण्यास तयार नाहीत, तर शिंदे गट उपमुख्यमंत्रिपदासाठी आनंदी नाहीये. त्याचवेळी शिंदे गटाकडून मुख्य खात्यांची मागणी केली गेली आहे. जर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिले तर गृहमंत्री पदही आम्हाला मिळालाय पाहिजे अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी केलीय.
गृहमंत्रिपदासह ,उद्योग,सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, शिक्षण,नगरविकास,आरोग्य, सांस्कृतिक, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती शिंदे गटाने मागितली आहेत. त्यामुळे सीएमचा दावा सुटला असला तरी खाते वाटपामुळे शिंदे गट आणि भाजपमधील दरी वाढणार की मिटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.