पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर : कोरोनाकाळात पती गमावल्यानंतर दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकटीने पेलणाऱ्या महिलेच्या आयुष्यात आज पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले. नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील राणी लक्ष्मी सभागृहात अभिजित मुहूर्तावर या महिलेचा पुनर्विवाह पार पडला. विशेष म्हणजे, या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
माजी आमदार संदीप जोशी यांच्या ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाअंतर्गत झालेला हा पहिला विवाह ठरला. संदीप जोशी आणि त्यांच्या पत्नी देवयानी जोशी यांनी या महिलेचे कन्यादान केले. या विवाहसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावले. त्यामुळे अनेक महिला आणि मुलांसमोर आर्थिक तसेच सामाजिक अडचणी उभ्या राहिल्या. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी संदीप जोशी यांच्या पुढाकारातून ‘सोबत’ पालकत्व प्रकल्प सुरू करण्यात आला. या उपक्रमातून कोरोनाकाळात २९३ कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कोरोनाकाळात अनेक कुटुंबांतील कर्ते पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबांचे भविष्य अंधारात आले होते. त्यावेळी संदीप जोशी पुढे आले आणि २९३ कुटुंबांची नोंदणी झाली. आपणही त्यावेळी या कुटुंबांपैकी १०० कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले होते, असे फडणवीस यांनी सांगितले. या कुटुंबांच्या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यात आले. त्यापैकी एका एकल मातेचा आज विवाह झाला आहे. पुढील काळात जवळपास ३०० मुलींचे विवाह होईपर्यंत आम्ही त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अल्पवयातच मोठ्या संकटांना सामोरे जावे लागलेल्या या कुटुंबांच्या आयुष्यात आता स्थैर्य येत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या अनाथ मुलांसाठीच्या आरक्षणाच्या निर्णयाचाही उल्लेख केला. महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षणाची तरतूद केली असून, त्यातून नियुक्त्याही होत आहेत, असे त्यांनी सांगितले. अनेक अनाथ मुलांना आश्रमात राहावे लागते. मात्र, या आरक्षणामुळे त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी मिळत आहे. मध्यंतरी अशा मुलांचे संमेलन घेतले होते. त्यावेळी त्यांच्या संघर्षमय जीवनकथा ऐकायला मिळाल्या, असेही फडणवीस म्हणाले. कोरोनाकाळात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर पालकत्व, आधार आणि नव्या आयुष्याची संधी देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. आज झालेला पुनर्विवाह हा त्याच माणुसकीच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.