रणजीत माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूर: तेली समाजाने महाराष्ट्रात संस्कार आणि सामाजिक मूल्यांची परंपरा जपली असून, राज्याला नवी दिशा देण्याचे काम हा समाज करत आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कोल्हापुरातील तेली समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी समाजाच्या शिक्षण, संघटन आणि जागेच्या प्रश्नांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.
संत जगनाडे महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर तेली समाज वाटचाल करत असल्याचे सांगत बावनकुळे यांनी समाजबांधवांना मुलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे आवाहन केले. मुलं ही आपली प्रॉपर्टी असून देशाचे भविष्य आहेत. 2047 चा विकसित भारत म्हणजे तेली समाजातील उच्चशिक्षित मुलगा आणि मुलगी हाच खरा भारत असेल, असे ते म्हणाले. तेली समाजातील विविध संघटनांना एकत्र आणून जातीपातीच्या भिंती तोडण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी मंत्री असताना समाजाला प्लॅटफॉर्म दिला आणि आता समाजाचे प्रश्न पुढे नेण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षात ताकद असलेला नेता म्हणून वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभेत त्यांचा आवाज कणखर आहे. त्यांचे भाषण संपेपर्यंत मी सभागृह सोडत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बावनकुळे यांनी एक मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. वडेट्टीवारजी आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावी लागेल. 2029 ला प्रयत्न करा, नाहीतर फार काळ तिकडे राहू नका, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. आपण आणि देवेंद्र फडणवीस वडेट्टीवारांचे जवळचे मित्र असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 35 वर्षांपासून मैत्री असून ते आपल्यावर मोठा विश्वास ठेवतात, असे बावनकुळे यांनी सांगितले. देवेंद्रजींचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की, ते माझी फाईलही वाचत नाहीत, असे म्हणत त्यांनी फडणवीसांसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. तसेच मुंबईतील तेली समाजाच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. त्या जागेवर तेली समाजाचे भवन आणि वसतिगृह उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रातील तेली समाजाच्या जागेसंबंधी प्रलंबित प्रश्नही सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. राज्यातील तेली समाजाच्या सर्व संघटनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळते. त्यांच्या कार्यालयात गेलेला समाजाचा एकही कागद विनाकारण परत येत नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.